वीज यंत्रणेतील बिघाडामुळे लागलेल्या आगीत प्रवासी बस जळून खाक झाल्याची घटना सांगलीतील तरूण भारत सोमवारी क्रीडांगणाजवळ घडली. महापालिकेच्या अग्निशमन पथकाने आग आटोक्यात आणली असली तरी आग विझवेपर्यंत बसचा सांगडाच उरला होता.
या आगीत कुणाला इजा झाली नसली तरी पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेसाठी सांगलीला येत असलेल्या दोन मुलींची महत्त्वाची कागदपत्रे जळून नष्ट झाली.
एमबी लिंक्स प्रवासी वाहतूक कंपनीची बस (एमएच ०९ जीजे ६९९७) लातूरहून कोल्हापूरला निघाली होती. आज सकाळी सहा वाजणेच्या सुमारास सांगलीतील तरूण भारत स्टेडियमजवळ आल्यानंतर बसमधून अचानक धूर येउ लागला. बस चालकांने बसमध्ये असलेल्या सहा प्रवाशांना तात्काळ खाली उतरण्यास सांगितले. यामुळे प्रवासी खाली उतरले आणि बसने पेट घेतला.
बसला आग लागल्याची माहिती मिळताच महापालिकेच्या अग्निशमन विभागचे पथक तात्काळ घटनास्थळी आले. त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले असले तरी एवढ्या कालावधीत बसचा केवळ सांगाडाच शिल्लक राहिला.
या बसमधून सांगलीत पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेसाठी दोन मुली आल्या होत्या. त्यांच्यासोबत आवश्यक कागदपत्रे बसमध्ये होती. बसला आग लागली असल्याने त्या मुलीही बसमधून खाली उतरल्या. मात्र, बसला लागलेल्या आगीत त्यांची कागदपत्रे जळून खाक झाली. पोलीसांनी त्यांना दिलासा दिला असून लेखी परीक्षेपासून वंचित ठेवले जाणार नाही असा शब्द दिला आहे.





