संपूर्ण देशातील LPG ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. केंद्र सरकारने घरगुती गॅस पुरवठ्याबाबत एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सरकारने म्हटले की, ज्या भागांमध्ये PNG (Piped Natural Gas) कनेक्शन उपलब्ध आहे आणि ते घरांपर्यंत पोहोचले आहे, त्या ठिकाणी लोकांनी PNG कनेक्शन घेणे अनिवार्य असेल. असे न केल्यास अशा घरांमध्ये 3 महिन्यांच्या आत LPG चा पुरवठा बंद केला जाईल. या निर्णयाचा उद्देश गॅस नेटवर्कचा विस्तार जलद करणे आणि एका इंधनावरची अवलंबित्व कमी करणे हा आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धामुळे आखाती देशांमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. पुरवठ्यात अडथळे येत असल्याने भारताला LPG च्या कमतरतेचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे सरकार घरगुती आणि व्यावसायिक वापरकर्त्यांना पाइपद्वारे येणाऱ्या नैसर्गिक वायूकडे (PNG) वळण्यासाठी प्रोत्साहन देत आहे. PNG चा पुरवठा पाइपलाइनद्वारे थेट स्वयंपाकघरातील बर्नरपर्यंत सतत होत राहतो, त्यामुळे सिलेंडर रिफिल बुक करण्याची गरज राहत नाही.
सरकारचा उद्देश काय आहे?
सरकारच्या या निर्णयाचा उद्देश अशा भागांमधून LPG चा पुरवठा कमी करणे आहे जिथे पाइपलाइन सुविधा उपलब्ध आहे आणि तो पुरवठा त्या भागांकडे वळवणे जिथे अशा सुविधा नाहीत. जागतिक पुरवठ्यातील अडथळे, होर्मुझ सामुद्रधुणीतील नाकेबंदी यांच्या पार्श्वभूमीवर सरकारचा हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे. यावर बोलताना तेल सचिव नीरज मित्तल यांनी म्हटले की, या सुधारांमुळे ‘संकटाचे संधीमध्ये रूपांतर करण्यात आले आहे.’ या आदेशाचा उद्देश मंजुरी प्रक्रिया सुलभ करणे, शुल्कांचे मानकीकरण करणे आणि ठराविक कालावधीत परवानग्या देणे हा आहे.




