मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजने’च्या अंतर्गत 89,75,298 शेतकऱ्यांना ₹17,98,78,24,000 च्या 8व्या हप्त्याचे वितरण करण्यात आले.
यावेळी मंत्री दत्तात्रय भरणे, मंत्री उदय सामंत, मंत्री दादाजी भुसे, राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
कोणत्या जिल्ह्याला किती मिळाले रुपये
जिल्हा वितरित रक्कम (कोटी ₹ मध्ये)
अहिल्यानगर 108.30
सोलापूर 97.52
कोल्हापूर 92.33
सातारा 87.07
पुणे 85.24
नाशिक 83.86
जळगाव 77.40
नांदेड 76.50
सांगली 75.49
बीड 72.70
छत्रपती संभाजीनगर 68.18
बुलढाणा 66.74
जालना 58.82
यवतमाळ 57.18
लातूर 53.87
अमरावती 53.34
परभणी 49.79
चंद्रपूर 47.95
धाराशिव 46.85
गोंदिया 42.45
भंडारा 41.65
अकोला 36.76
हिंगोली 35.00
नागपूर 33.88
वाशिम 33.05
रत्नागिरी 31.21
धुळे 30.63
गडचिरोली 28.50
वर्धा 25.60
सिंधुदुर्ग 23.53
रायगड 22.79
नंदुरबार 20.47
पालघर 19.95
ठाणे 14.18
‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजनेंतर्गत 24 मार्च 2026 अखेर एक ते सात हप्त्यांमध्ये एकूण 13017.30 कोटी रुपये 93.08 लाख शेतकरी कुटुंबाच्या खात्यावर थेट लाभ हस्तांतरण द्वारे जमा करण्यात आले आहेत.
नमो शेतकरी महासन्मान निधी योजना
केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर राज्य शासनाने नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना थेट आर्थिक सहाय्य देऊन शेतीचा वाढता खर्च कमी करणे आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे हा मुख्य उद्देश आहे.
शेतकऱ्यांना मिळतात 12,000 रुपये
प्रधानमंत्री किसान योजनेतून प्रति शेतकरी दरवर्षी रु. 6,000 अनुदान दिले जाते. त्यात राज्य शासनाकडून आणखी रु. 6,000 इतकी भर घालण्यात येत असून, या दोन्ही योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना प्रतिवर्षी *रु. 12,000* इतकी थेट आर्थिक मदत मिळते. या हप्त्यासाठी रु.1,774 कोटी निधी वितरीत करण्यास मान्यता देण्यात आली असली तरी प्रत्यक्षात 1, 820 कोटी इतकी रक्कम शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे.
नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत आतापर्यंत सात हप्ते वितरीत करण्यात आले असून, आठवा हप्ता हा ऑगस्ट 2025 ते नोव्हेंबर 2025 या कालावधीसाठी दिला जाणार आहे. केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 22 वा हप्ता दिनांक 13 मार्च 2026 रोजी वितरीत केल्यानंतर राज्य शासनानेही तत्काळ हालचाल करत नमो योजनेचा आठवा हप्ता वितरीत करण्याची प्रक्रिया गतीने पूर्ण केली आहे.
या निर्णयामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना थेट आर्थिक दिलासा मिळणार असून, शेतीसाठी लागणारा खर्च भागविण्यास मोठी मदत होणार आहे. तसेच ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळून शेती अधिक सक्षम आणि टिकाऊ होण्यास मदत होईल

