शिरोळ तालुक्यातील शिरढोण व टाकवडे परिसरात शेतीला पुरवठा करण्यात येणाऱ्या रसायनमिश्रित पाण्यामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे.
पंचगंगा नदीतून सोडण्यात येणारे दूषित पाणी थेट शेतात पोहोचत असल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. या पाण्याचा रंग काळसर-निळसर असून त्यातून तीव्र दुर्गंधी येत असल्याने शेतीची कामे करणेही अवघड झाले आहे.
दिवसभर सिंचनासाठी येणारे पाणीच दूषित असल्याने जमिनींची सुपीकता धोक्यात आली आहे. अनेक शेतांमध्ये क्षारपड वाढत असून पिके करपत आहेत. परिणामी उत्पादन घटून शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान प्रचंड वाढले आहे. आधीच संकटात असलेल्या शेतकऱ्यांसमोर आता जगण्याचाच प्रश्न उभा ठाकला आहे.
याहून गंभीर बाब म्हणजे या पाण्याच्या संपर्कात येणाऱ्या शेतकऱ्यांच्या पायांना जखमा होत आहेत. त्वचारोग, खाज व इतर आजारांचे प्रमाण वाढत असल्याने आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दूषित पाणी वापरल्याशिवाय पर्याय नाही आणि वापरले तर नुकसान निश्चित, अशा कोंडीत शेतकरी सापडला आहे.
पंचगंगा नदीतील वाढते प्रदूषण हेच या संकटामागील मुख्य कारण असल्याचा आरोप होत आहे. संबंधित यंत्रणांनी तातडीने लक्ष घालून दोषींवर कठोर कारवाई करावी, पाण्याची गुणवत्ता तपासावी आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई द्यावी, अशी जोरदार मागणी होत आहे. अन्यथा तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा शेतकरी वर्गाने दिला आहे.
कारवाईची जोरदार मागणी
शिरढोण-टाकवडे परिसरातील शेतीला येणारे दूषित, रसायनमिश्रित पाणी तातडीने थांबवावे. पंचगंगा नदीतील प्रदूषणासाठी जबाबदार घटकांची चौकशी करून कठोर कारवाई करावी. शेतीचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक भरपाई द्यावी. पाण्याचे नमुने तपासून त्याचा अहवाल सार्वजनिक करावा शेतकऱ्यांच्या आरोग्याची तपासणी करून वैद्यकीय सुविधा उपलब्ध कराव्यात. अन्यथा, शेतकरी आंदोलन छेडतील, असा इशारा देण्यात आला आहे.




