गुजरातच्या वडोदऱ्यातून एका धक्कादायक आणि थरारक घटना समोर आली आहे. या ठिकाणी एका पत्नीने प्रेमप्रकरणासाठी पतीचा काटा काढण्याचा डाव रचल्याचं समोर आलं आहे. यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून पोलिसांनी पत्नीसह सहा जणांना बेड्या ठोकल्या आहेत.
वडोदऱ्याच्या छानी परिसरात १५ एप्रिलच्या रात्री पान टपरी चालवणारा गिरीश पटेल याच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गिरीश नेहमीप्रमाणे रात्री घरी जात होता. मात्र यावेळी काही लोकांनी त्याचं अपहरण केलं. त्याला जबरदस्तीने कारमध्ये बसवलं आणि चाकूचा धाक दाखवत वेगवेगळ्या ठिकाणी नेलं. अखेरीस त्याला सोजीत्राजवळच्या एका कालव्यात फेकून दिलं.
हल्लेखोर झाले फरार
अपहरण केलेल्या लोकांना वाटलं की, गिरीशचा मृत्यू झाला असेल. त्यामुळे ते त्या ठिकाणाहून फरार झाले. मात्र या घटनेला वेगळच वळण मिळालं. कालव्यात पडूनही गिरीशचा जीव वाचला. त्याने हार न मानता स्वतःला सांभाळलं आणि कसंबसं कालव्याच्या बाहेर काढलं. जवळपास ३ तासांनी तो कालव्याबाहेर आला आणि तो पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला. त्याठिकाणी त्याने पोलिसांना संपूर्ण प्रकार सांगितला.
पोलिसांनी तातडीने या सर्व घटनेचा तपास सुरू केला. शिवाय यावेळी पाच संशयितांना ताब्यात घेतलं. ज्यावेळी पोलिसांनी चौकशी केली तेव्हा धक्कादायक गोष्टी समोर आल्यात.
तपासादरम्यान काय आलं समोर?
ज्यावेळी पोलिसांनी तपास केला तेव्हा गिरीश पटेलची पत्नी फाल्गुनी हिचे खेडा इथल्या एका सलून चालक कौशिक शर्मा याच्याशी अफेअर असल्याचं समोर आलं. या दोघांनी मिळून गिरीशचा काटा काढायचं ठरवलं. पोलिसांनी सांगितलं की, कौशिकने नरेंद्र उर्फ निकुल गोस्वामी याला ३५ हजार रूपये देत गिरीशची हत्या करण्यास सांगितलं होतं.
या घटनेपूर्वी फाल्गुनी आणि कौशिक यांच्यात संपर्क झाल्याचंही समोर आलं. त्यांनी एकमेकांना १०० पेक्षा जास्त फोन केल्याचं समोर आलं. त्यांनी रचलेल्या या कटामध्ये रूद्र रावल नावाच्या व्यक्तीला गिरीशवर नजर ठेवण्यास सांगितलं असल्याचं समोर आलं.
गिरीशकडून पैसे आणि एटीएम कार्ड लुटलं
अपहरण केल्यानंतर त्या अरोपींनी गिरीशकजून पैसे आणि एटीएम कार्ड लुटल्याची माहिती आहे. त्याचप्रमाणे आपली ओळख उघड होऊ नये म्हणून त्यांनी त्या कार्डचा वापर केला नाही. दरम्यान अटक केलेल्या सर्व आरोपींना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं असून पुढील तपास सुरु आहे.


