मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी काल रात्री आमरण उपोषण मागे घेतले. उपोषणावेळी मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली होती. भर उन्हात त्यांच्या या आंदोलनाने राज्यात वातावरण तापले होते. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची मध्यस्थी यशस्वी ठरली. सरकारने काही मागण्यांवर वेळ मागून घेतला. ते जरांगे यांनी मान्य केले. त्यानंतर या सर्व घडामोडींवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सरकारने दिलेल्या आश्वासनांवरही मत व्यक्त केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर मोठी प्रतिक्रिया दिली. “जी आश्वासने दिली तुमच्यासमोर आहे. मागे काही नाही. ती त्यांनी वाचून दाखवली आहे. विखे पाटील आणि प्रसाद लाड यांनीही आश्वासने वाचून दाखवली आहेत. सातत्याने मराठा समाजाला न्याय देण्याची भूमिका राहिली आहे. त्यानुसार न्याय देण्याचं काम केलं आहे.” असे मुख्यमंत्री म्हणाले.
ओबीसी आरक्षणावर मुख्यमंत्र्यांची काय भूमिका?
काल मुख्यमंत्र्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणावर मोठी प्रतिक्रिया दिली होती. नागपूरमध्ये बोलताना त्यांनी मराठा आरक्षणाबाबत आपण आणि एकनाथ शिंदे यांच्या सरकारनेच सर्वाधिक प्रयत्न केल्याचे म्हटले होते. तर ओबीसी समाजाचे आरक्षण कमी करून मराठा समाजाला दिले जाणार नसल्याने ओबीसी समाजाला घाबरण्याची काहीएक गरज नाही अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली होती. मराठा समाजाच्या आरक्षणाविषयी सुरूवातीपासूनच सरकारची सकारात्मक भूमिका राहिली आहे. न्यायालय, कायदा आणि संविधानाच्या चौकटीत राहून आम्ही कुठलाही निर्णय घेण्यास तयार आहोत, अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी काल जाहीर केली होती.
तर केवळ प्रसिद्धीसाठी घेतलेले निर्णय टिकणार नाहीत. सर्वोच्च न्यायालय , न्यायालयाचे निर्णय लक्षात घेऊनच पुढे जावे लागेल अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली होती. काल मनोज जरांगे पाटील यांनी सकाळी दहा वाजता अंतरवाली सराटीत आमरण उपोषणाला सुरुवात केली होती. त्यानंतर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी यशस्वी शिष्टाई केली. त्यानंतर जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतले.




