देशाच्या विविध भागातील हवामानात बदल होत आहे. अशातच आता हवामान विभागाने देशातील 17 राज्यांसाठी पुढील 21 तासांसाठी हवामानाचा अंदाज जारी केला असून काही राज्यांना अलर्ट जारी करण्यात आला आहे. मध्य उत्तर प्रदेशावर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून राजस्थानपासून पश्चिम बंगालपर्यंत पसरलेल्या चक्रीवादळी वाऱ्यांमुळे अनेक भागांमध्ये जोरदार वादळ, धुळीची वादळे आणि मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काही भागांमध्ये ताशी 80 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे. तर मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांमध्ये उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. राज्याच्या कोणत्या भागात हवामान कसे असेल ते जाणून घेऊयात.
दिल्ली-उत्तर प्रदेश
दिल्ली आणि एनसीआर परिसरात हवामान विभागाने वादळी वाऱ्यासह पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे. दुपारनंतर ताशी 50 ते 60 किमी वेगाने वारे वाहू शकतात. उत्तर प्रदेशमध्ये दुहेरी हवामानाचा तडाखा बसू शकतो. मेरठ, गाझियाबाद आणि गौतमबुद्ध नगरसह पश्चिम उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमध्ये ताशी 60 किमी वेगाने धुळीचे वादळ येण्याची शक्यता आहे. तसेच या भागात जोरदार पावसाचाही इशारा देण्यात आला आहे. पूर्व उत्तर प्रदेशात 50 ते 70 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.
राजस्थान
राजस्थानमध्ये वादळी वाऱ्याचे रौद्र रूप पाहायला मिळू शकते. पूर्व आणि पश्चिम राजस्थानमध्ये ताशी 70 ते 80 किमी वेगाने वारे वाहण्याचा इशारा देण्यात आला आहे. जैसलमेर, बाडमेरसारख्या सीमावर्ती भागांत धुळीचे मोठे वादळ निर्माण होऊ शकते. काही भागांत गारपीट आणि अचानक मुसळधार पावसाचाही अंदाज आहे.
बिहार-मध्य प्रदेश
बिहारमध्ये चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे, काही भागात ताशी 50 ते 60 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. ईशान्य बिहारमध्ये वीज कोसळण्याचा उच्चस्तरीय इशारा देण्यात आला आहे. तर मध्य प्रदेशमध्ये मान्सूनची चाहूल लागली आहे. भोपाल, इंदूर, उज्जैनसह 31 जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. पश्चिम मध्य प्रदेशात ताशी 50 ते 70 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.
पश्चिम बंगाल
पश्चिम बंगालमध्ये मान्सून सक्रिय झाला आहे. उप-हिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये पुढील 6 ते 7 दिवस अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोलकात्यासह गंगेच्या खोऱ्यातील पश्चिम बंगालमध्ये ताशी 40 ते 50 किमी वेगाने वारे वाहण्याची आणि मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
आसाम आणि मेघालय
आसाम आणि मेघालयमध्ये मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. सततच्या पावसामुळे नद्यांची पातळी वाढत असून पूरस्थिती आणि भूस्खलनाचा धोका निर्माण झाला आहे. प्रशासनाकडून नागरिकांना अनावश्यक प्रवास टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
दक्षिण भारत
कर्नाटकच्या किनारी भागात आणि अंतर्गत कर्नाटकमध्ये मान्सूनचा जोर कायम राहणार आहे. किनारी भागात ताशी 40 ते 50 किमी वेगाने वारे वाहू शकतात आणि मुसळधार पाऊस पडू शकतो. समुद्रात उंच लाटा निर्माण होण्याची शक्यता असल्याने मच्छीमारांना खोल समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. केरळमध्ये मान्सून पूर्ण ताकदीने सक्रिय आहे. बहुतांश भागांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
पंजाब आणि हरियाणा
पंजाब आणि हरियाणामध्ये दुपारनंतर वादळी वाऱ्यांसह पावसाचा अंदाज आहे. काही भागात वाऱ्यांचा वेग 40 ते 50 किमी प्रतितास राहू शकतो. धुळीच्या वादळासह होणारा पाऊस उभ्या पिकांवर परिणाम करू शकतो, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे.





