वाढत्या खर्चाच्या पार्श्वभूमीवर एसटीच्या भाड्यात १३.५६ टक्के वाढ करण्यात आली आहे. राज्य परिवहन प्राधिकरणाने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या १३.५६ टक्के भाडेवाढीच्या प्रस्तावास मान्यता दिली आहे. आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे डिझेलच्या दरात झालेली वाढ, एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध भत्त्यांमध्ये केलेली वाढ तसेच वाहनांचे सुटे भाग, टायर आणि देखभाल खर्चात झालेली लक्षणीय वाढ यांचा सर्वंकष विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे. अर्थात, या भाडेवाढीमुळे यापुर्वी केलेली साध्या बसेसची १० टक्के हंगामी भाडेवाढ रद्द होणार आहे. एसटीची ही दरवाढ आज १७ जुलै २०२६ च्या मध्यरात्री १२ वाजल्यापासून लागू होणार आहे
एसटी महामंडळाच्या आर्थिक आधारासह प्रवाशांना सुरक्षित, दर्जेदार आणि अखंड सेवा देण्यासाठी ही भाडेवाढ अपरिहार्य होती. वाढत्या खर्चाचा भार सहन करत राज्यातील लाखो प्रवाशांना सेवा देणाऱ्या एसटीच्या दैनंदिन कार्यावर आर्थिक ताण निर्माण होत असल्याने, सेवा सुरळीत ठेवण्यासाठी भाडेवाढीचा निर्णय आवश्यक असल्याचे महामंडळाने म्हटले आहे.
कमी आर्थिक भार पडेल, याची काळजी – सरनाईक
ही भाडेवाढ एसटीची सेवा अधिक सक्षम आणि टिकाऊ बनविण्यासाठी करण्यात आली असून, प्रवाशांच्या सुरक्षित आणि विश्वासार्ह प्रवासासाठी आवश्यक सुविधा आणि गुणवत्तापूर्ण सेवा कायम राखण्यास त्यामुळे मदत होणार आहे. एसटीची ही भाडेवाढ करताना प्रवाशांवर कमीत कमी आर्थिक भार पडेल, याची काळजी घेण्यात आली आहे. राज्यातील सर्वसामान्य जनतेला सुरक्षित, दर्जेदार आणि अखंडित सेवा देण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा असल्याचे महामंडळाचे अध्यक्ष आणि परिवहन मंत्री प्रतापराव सरनाईक यांनी म्हटले आहे.



