नांदणी (ता. शिरोळ) येथील मठातील ‘माधुरी’ हत्तीणीला गुजरातच्या ‘वनतारा’ येथे नेऊन वर्ष झाले आहे. सर्वोच्च न्यायालय, हाय पॉवर कमिटी आणि वनतारा प्रशासनाने माधुरी हत्तीणीला नांदणी मठाकडे (Vantara Madhuri Elephant homecoming update) परत करण्याचा निर्णय देऊनही केवळ प्रशासकीय दिरंगाईमुळे हत्ती पाठविण्यास विलंब होत आहे.
या विलंबाच्या निषेधार्थ आणि माधुरीच्या तातडीने घरवापसीसाठी नांदणी येथे लाक्षणिक उपोषण करण्यात आले. १३ सप्टेंबरपर्यंत माधुरीची घरवापसी न झाल्यास मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी जाऊन जाब आणि त्यानंतर मुंबईत मोर्चाची घोषणा करू असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे.
माधुरी हत्तीणीच्या आगमनाला होत असलेल्या विलंबाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी सकाळी सात वाजल्यापासून नांदणी निशिधिका येथे माता चक्रेश्वरी देवीची महाआरती करून जनसंकल्पाची सुरुवात करण्यात आली. हे लाक्षणिक उपोषण आज सायंकाळी सातपर्यंत चालू राहिले.
भाविकांनी प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त करताना सांगितले की, वनतारा प्रशासनाकडून नांदणी या ठिकाणी हत्तीच्या देखभालीसाठी सर्व अद्ययावत सोयी-सुविधा केंद्र उभारण्यात आले आहे. आवश्यक त्या सर्व कायदेशीर बाबी पूर्ण झाल्या असतानाही केवळ तज्ज्ञ समितीच्या अंतिम अहवालाअभावी माधुरी हत्ती येण्यास विलंब लागत आहे. जो जैन समाज आणि स्थानिक जनतेच्या भावनांशी खेळ आहे. १३ सप्टेंबरला नांदणी येथे प्रथमाचार्य शांतिसागर महाराज यांच्या शंभराव्या चातुर्मास निमित्ताने ७१ वी ऐतिहासिक पुण्यतिथी होणार आहे. या महामहोत्सवासाठी सांगली, कोल्हापूर आणि उत्तर कर्नाटकातून जवळपास तीन लाख भाविक उपस्थित राहणार आहेत.
तेराशे वर्षांचा प्राचीन इतिहास असलेल्या या मठाच्या धार्मिक परंपरेत चारशे वर्षांपासून हत्तीचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. या ऐतिहासिक सोहळ्यापूर्वी माधुरी हत्ती मठात दाखल व्हावी, अशी मागणी केली. प्रशासनाने त्वरित पावले न उचलल्यास आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी आंदोलनाला भेट दिली.
१४ ऑगस्टला धरणे
माधुरी हत्तीणीच्या घरवापसीसाठी १४ ॲागस्टला प्रत्येक गावात ग्रामपंचायतीसमोर एक दिवसाचे धरणे आंदोलन करण्याचा इशारा श्री. शेट्टी यांनी दिला.


