कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून दमदार पाऊस सुरू आहे. दमदार पाऊस आणि संततधारेमुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे.
बुधवारी पहाटे पंचगंगा नदीवरील कोल्हापूर राजाराम बंधारा पाण्याखाली गेला याचबरोबर, शिंगणापूर, सुर्वे, रुई व इचलकरंजी तर वारणा नदीवरील चिंचोली आणि माणगाव असे सात बंधारे पाण्याखाली गेले आहेत.
धरण क्षेत्रात चांगला पाऊस होत आहे. पाच धरणांच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या २४ तासांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. पंचगंगेची पाणीपातळी सकाळी दहा वाजता अठरा फुटावर गेली होती.
जिल्ह्यातील घाट भागांमध्ये अतिवृष्टी
भारतीय हवामान खात्याने आज आणि उद्या दि. 8 सप्टेंबर 2021 रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील घाट भागांमध्ये अतिवृष्टी होणार असल्याचा इशारा दिला आहे. या इशाऱ्यानुसार जिल्ह्यामध्ये उद्या दि. 8 सप्टेंबर 2021 पर्यंत जिल्ह्यातील घाट भागांमध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे.
अतिवृष्टी कालावधीमध्ये जिल्हा प्रशासनामार्फत दिल्या जाणाऱ्या सूचनांकडे नागरिकांनी लक्ष द्यावे व सूचनांचे पालन करावे. तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये,असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी जिल्ह्यातील सर्व नागरिकांना केले आहे.
आपल्या गावात, परिसरात अतिवृष्टी मुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास बाह्य मदतीची गरज असल्यास जिल्हा नियंत्रण कक्षाच्या 1077 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा.