जत तालुक्यातील रेवनाळ येथे सोमवारी दुपारी विहिरीत पडलेल्या नातवाला वाचवताना आजोबाचाही दुर्दैवी मृत्यू होण्याची घटना घडली. या घटनेने गावात हळूहळू व्यक्त होत आहे. आबा कड्याप्पा कुलाळ ( वय 60 ) व नातू कार्तिक गुरुदेव कुलाळ (वय 03) असे मयत झालेल्या आजोबा व नातवांची नावे आहेत.
घटनास्थळावरून समजलेली माहिती अशी की, रेवनाळ जत रस्त्यावर कुळालवस्ती येथील आबा कुडाळ हे आपल्या शेळ्या घेऊन चरवण्यासाठी शेजारच्या रानात गेले होते. आजोबा जिथे शेळ्या चरवत होते, तिथून जवळच त्यांचे घर आहे. यावेळी त्यांचा चिमुकला नातू आजोबांच्या पाठीमागे पळत आला.
तो बांधाच्या लगतहून येत असताना पायातील बुट अडकून शेजारीच असणाऱ्या आणि काठोकाठ भरलेल्या विहिरीत नातवाचा तोल जाऊन तो पडला. नातू विहिरीत पडल्याचे दिसताच आजोबांनी त्यास वाचवण्यासाठी विहीरीत उडी घेतली. परंतु मुलाने त्यांना मिठी मारल्याने या पाण्यातून त्यांना बाहेर पडणे जमले नाही. यात दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला.
दरम्यान, ही घटना गावकऱ्यांना समजताच या दोघांचेही मृतदेह काढण्यासाठी मोठे प्रयत्न करण्यात आले. पण विहीर 40 फूट खोल असल्याने व काठोकाठ भरलेली असल्याने मृतदेह शोधण्यात अडथळे येत होते. सायंकाळी अजनाले ता. सांगोला येथून पाणबुडी टीम बोलावून दोघांचेही मृतदेह बाहेर काढण्यात आले. या घटनेची रात्री उशिरा पोलिसात नोंद झाली आहे.