३ मे नंतर आपली दिशा वेगळी असेल असे मोठे वक्तव्य खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केले आहे. संभाजीराजेंची खासदारकीची मुदत ३ मे रोजी संपत आहे. त्यामुळे ३ मे नंतर राजकीय दिशा स्पष्ट करणार असल्याचे संभाजीराजे यांनी सांगितले आहे. संभाजीराजेंच्या या वक्तव्यामुळे राजकीय चर्चांना मात्र उधाण आले आहे.
कोल्हापूर उत्तर मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी मंगळवारी मतदान पार पडल्यानंतर संभाजीराजे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यांनी यावेळी बोलताना ३ मे नंतर माझी राजकीय दिशा स्पष्ट करणार असून ती नक्की वेगळी असेल असे जाहीर केल्यामुळे संभाजीराजे भाजप, शिवसेना किंवा राष्ट्रवादीत प्रवेश करत नवा घरोबा करणार की आपला नवा पक्ष स्थापन करणार, याची चर्चा रंगली आहे.
तुमचा खासदारकीचा कार्यकाळ संपल्यावर राजकीय भूमिका काय असेल? असे प्रसारमाध्यमांनी विचारले असता त्यांनी सांगितले की, वेट अँड वॉच आहे…३ मे रोजी माझी मुदत संपत आहे. निश्चित वेगळी दिशा असणार यामध्ये काही दुमत नाही. पण काय दिशा असणार आहे त्यासाठी वाट पाहूया. ३ मे नंतर आपण पुन्हा एकदा बोलू.