ताजी बातमी ऑनलाईन टीम
राज्यात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची सख्या वाढत आहे. शनिवारी एकाच दिवसात राज्यात 1397 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. यातील 889 रुग्ण एकट्या मुंबईत आढळून आले. त्यामुळे मुंबईकरांची चिंता वाढली आहे. दरम्यान राज्य सरकारकडूनही नागरिकांना मास्क लावण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने उन्हाळी सुट्ट्यांनंतर शाळा सुरू होणार की बंदच राहणार असा प्रश्न पालकांना पडला आहे. यावर शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी राज्य सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे.
शाळा सुरु होण्यासंदर्भातील प्रश्न विचारल्यानंतर शिक्षणमंत्र्यांनी सांगितले की “कोरोना प्रकरणांची संख्या वाढत आहे. अशा परिस्थितीत शाळांना योग्य ती खबरदारी घेण्याचे आणि नियमांचे पालन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र शाळा पुन्हा बंद करणे योग्य ठरणार नाही”. तसेच त्यांनी यावेळी सर्वांना मास्क लावण्याचे आवाहन केले. सध्या राज्यात मास्क सक्ती नसली तरी नागरिकांनी मास्क वापरावेत असे त्या म्हणाल्या.
केंद्राचं पाच राज्यांना पत्र
कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने महाराष्ट्रासह पाच राज्यांना पत्र लिहिले आहे. केंद्राने आपल्या पत्रात राज्यातील सहा जिल्ह्यांतील रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश दिले आहेत. यात मुंबई आणि मुंबई उपनगरासह ठाणे पालघर आणि पुणे या शहरांचा समावेश आहे. त्यामुळे मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांनी मास्क सक्ती नसली तरी नागरिकांना गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्याचे आणि कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.