रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावरील आंबा घाटातील गायमुख जवळच्या एका अवघड वळणावर रस्त्याचा अंदाज न आल्याने कर्जतवरून कोल्हापूर-गणपतीपुळे मार्गावर प्रवास करणारी टेम्पो ट्रॅव्हलर काल रविवारी रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास खोल दरीत जाता जाता वाचली आणि पुढील मोठी दुर्घटना टळली. केवळ नशीब बलवत्तर म्हणून सगळे प्रवाशी या अपघातातून बचावले आहेत. त्यामुळे काळ आला होता पण वेळ आली नव्हती असेच या घटनेवरून म्हणावे लागेल.
ही गाडी कोल्हापूर मार्गे आंबा घाटातून गणपतीपुळेकडे येत असताना घाटात दाट धुके असल्याने हा अपघात घडला असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सुदैवाने हे प्रवासी सुमारे ५०० फूट खोल दरीत जाण्यापासून बचावले. संरक्षण कठडा असल्याने ही गाडी वरतीच लटकली. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच साखरपा पोलीस दुरक्षेत्राचे कर्मचारी वैभव कांबळे, अर्पिता दुधाने, प्रशांत नागवेकर, वैभव नटे आदी घटनास्थळी पोहोचले. तसेच जेसीबी चालक अशोक जाधव, सामाजिक कार्यकर्ते पप्या दुधाने घटनास्थळी पोहचले. यांनी धोकादायक स्थितीत असलेली गाडी बाहेर काढून सर्व प्रवाशांचा जीव वाचवला.