राज्यात आजही पावसाचा जोर कायम आहे. कोल्हापुरात गेली दोन दिवस पावसाने धुवाँधार उडवली आहे. मुसळधार पावसाने नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. तर राधानगरी धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे आज पहाटे उघडले आहेत. धरणातून ७३१२ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरूआहे. तर पंचगंगा नदी पुन्हा पात्राबाहेर आली आहे. सध्या पंचगंगेची पाणी पातळी २९.११ फुटावर आहे.
आतापर्यंत जिल्ह्यातील ५० बंधारे पाण्याखालील गेले आहेत. कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्याने कोयना धरणाचे ६ वक्रदरवाजे आज दुपारी २ नंतर उघडणार आहेत. त्यामुळे कोयना नदीपात्राजवळील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे.
कोयनेचे ६ वक्र दरवाजे उघडणार शहर व परिसरात गेले चार दिवस पावसाची सततधार सुरू आहे. कृष्णा आणि कोयना नदीच्या पाणीपातळी मधे वाढ होऊ लागली आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारली होती परंतु पाणलोट क्षेत्रात पुन्हा पावसाने जोर धरला आहे.
कोयना पाणलोट क्षेत्रात सुमारे ११६ मिमी पाऊस झाला आहे. हवामान खात्याने काही गावांना सतर्केतेचा इशारा दिला आहे. तसेच कोयना नवजा पाणलोट क्षेत्रात १४३ मिमी पाऊस झाला आहे. कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून पर्जन्य आवक वाढल्याने आज (दि. १३ सप्टेंबर २०२२ ) रोजी दुपारी २:00 वाजता कोयना धरणाचे ६ वक्रदरवाजे १ फुट ६ इंच उघडून १२८९१ क्युसेक्स विसर्ग सोडणे येणार आहे.
धरण पायथा विद्युत गृहामधून १०५० क्युसेक्स विसर्ग चालू असलेने कोयना धरणातून नदीपात्रात एकूण १३९४१ क्युसेक्स विसर्ग सुरू राहणार आहे. त्यामुळे कोयना नदीपात्राजवळील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे.