आखाती देशांमध्ये भडकलेल्या युद्धाचा थेट परिणाम आता नृसिंहवाडी येथील जनजीवनावर आणि अर्थव्यवस्थेवर दिसू लागला आहे. नृसिंहवाडी येथे गॅस सिलेंडरच्या तीव्र टंचाईमुळे मोठी समस्या निर्माण झाली असून, येथील प्रसिद्ध हॉटेल व्यवसाय आणि मिठाई उत्पादन पूर्णपणे ठप्प झाले आहे.
इंधनाचा पुरवठा विस्कळीत झाल्याने व्यावसायिकांवर आपली दुकाने बंद ठेवण्याची वेळ आली आहे. तसेच येथील लग्न, मुंज व इतर धार्मिक कार्यक्रमांमधील जेवणावळींवर मर्यादा आली आहे.
नृसिंहवाडी हे तीर्थक्षेत्र असल्याने येथे वर्षभर भाविकांची मोठी वर्दळ असते. येथील बासुंदी, पेढे आणि विविध प्रकारचे मिठाई पदार्थ महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा खंडित झाल्याने या उद्योगाला घरघर लागली आहे. आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे कच्च्या तेलाच्या आयातीवर आणि गॅस उत्पादनावर परिणाम झाला असून, त्याचे लोण आता थेट स्थानिक गॅस वितरणापर्यंत पोहोचले आहे.
हॉटेल आणि मिठाईची दुकाने बंद असल्याने दर्शनासाठी येणाऱ्या हजारो भाविकांची खाण्यापिण्याची मोठी गैरसोय होत आहे. सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण आणि वाडीची प्रसिद्ध बासुंदी मिळणे कठीण झाले आहे. शिल्लक गॅस सिलेंडर वापरून होईल तेव्हढे उत्पादन करण्याचा प्रयत्न दिसून येत आहे. यामुळे परिसरातील आर्थिक उलाढाल मंदावली असून, रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगारांच्या रोजगाराचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.
मोठ्या प्रमाणावर मिठाई उत्पादन करण्यासाठी व्यावसायिक गॅस शेगड्यांचा वापर केला जातो. अचानक उद्भवलेल्या या टंचाईमुळे लाकूड किंवा कोळशाचा वापर करणे सर्वांनाच शक्य नाही. तसेच यामुळे उत्पादन तयार करण्यास अधिकचा वेळ खर्च होणार आहे. “सिलेंडरचा साठा संपला असून नवीन नोंदणी करूनही पुरवठा कधी होईल याची शाश्वती नाही,” अशी व्यथा एका स्थानिक हॉटेल व्यावसायिकाने मांडली.
आखाती देशांतील युद्ध लांबणीवर पडल्यास ही टंचाई अधिक तीव्र होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. केवळ नृसिंहवाडीच नव्हे, तर आसपासच्या परिसरातील इतर छोटे-मोठे व्यवसायही यामुळे अडचणीत आले आहेत. शासनाने आणि संबंधित गॅस कंपन्यांनी या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी तातडीने हस्तक्षेप करावा आणि जीवनावश्यक सेवा मानून हॉटेल व्यवसायाला सिलेंडरचा पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी व्यापारी संघटनेकडून केली जात आहे. जोपर्यंत इंधन पुरवठा पूर्ववत होत नाही, तोपर्यंत नृसिंहवाडीतील ही प्रसिद्ध बाजारपेठ अशीच शांत राहण्याची चिन्हे दिसत आहेत.
– गुंडो पुजारी, अध्यक्ष, दत्त देवस्थान, नृसिंहवाडीश्री नृसिंहसरस्वती स्वामी दत्त देवस्थानच्या भैरंभट जेरे प्रसादालयात नियमित दोन वेळेस महाप्रसाद सुरू आहे. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिलेल्या पत्रानुसार दररोज तीन व्यावसायिक सिलेंडर देवस्थान प्रसादालयाकडे येत आहेत. मात्र ही व्यवस्था जर खंडित झाली तरी भक्तांची गैरसोय होऊ नये, म्हणून प्रसंगी चूल मांडून महाप्रसाद सुरू ठेवणार आहोत.






