ताजी बातमी ऑनलाईन टीम
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आज होणारी सुनावणी आता चार आठवडे लांबवणीवर गेली आहे. आता पुढील सुनावणी ही 29 नोव्हेंबरला होणार आहे. आजच्या सुनावणीमध्ये घटनापीठाकडून दोन्ही पक्षांना लेखी स्वरुपात आपली बाजू मांडण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यासोबतच दोन्ही बाजूने कोणते मु्द्दे मांडवे आणि कोणते वकील बाजू मांडतील याविषयी देखील माहिती द्यावी असे निर्देश कोर्टाकडून देण्यात आले.
शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करून भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत महाराष्ट्रात सत्ता स्थापन केली. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रिपदी आणि फडणवीस हे उपमुख्यमंत्रिपदी विराजमान झाले. तेव्हापासून राज्यात मोठा सत्तासंघर्षावर पाहायला मिळत आहे. खरी शिवसेना कोणाची? असा वाद सध्या सुरु आहे. एकनाथ शिंदेंनी शिवसेना पक्षावर दावा केला. यासोबतच उद्धव ठाकरेंकडूनही शिवसेनेवर हक्क सांगितला जात आहे. आता हा वाद सुप्रीम कोर्टात पोहोचला आहे. यावर निवडणूक आयोग निर्णय घेणार आहे.
आता आमदारांच्या अपात्रतेविषयी आणि इतर कायदेशीर पेचावर सुप्रीम कोर्टाला निर्णय द्यायचा आहे. यासंदर्भातच आज, 1 नोव्हेंबरला सुप्रीम कोर्टात महत्त्वाची सुनावणी झाली. सुप्रीम कोर्ट काय निर्णय देणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. मात्र आता पुन्हा एकदा निर्णयाची प्रतिक्षा करावी लागणार आहे.