बेळगाव जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे. धबधब्यांचा (Belgaum Waterfalls) परिसर अधिक धोकादायक बनला आहे. यामुळे गोकाक फॉल्ससह जिल्ह्यामधील सर्व धबधब्यांवर पर्यटकांना भेट देण्यावर बंदी घालण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. नीतेश पाटील यांनी दिली.
जोरदार पावसामुळे जिल्ह्यात नदी आणि नाल्यांमधील पाणीपातळी वाढली आहे. घरांची पडझड, पिके पाण्याखाली गेली आहेत. धबधबे ओसंडून वाहत आहेत. यामुळे पर्यटक धबधब्यांना भेट देण्यासाठी ठिकाणी परिसरात मोठ्या संख्येने गर्दी करत आहेत. पण, यामुळे वाहतुकीची कोंडी होत आहे.
काही ठिकाणी अपघात घडले आहेत. त्यासाठी खबरदारी म्हणून आणि दुर्घटना टाळण्यासाठी धबधब्यावर जाण्यास निर्बंध घालण्यात आहेत. यामुळे धबधब्याच्या ठिकाणी पर्यटकांनी, नागरिकांनी जाऊ नये. परिसरात जाण्यावर मज्जाव घालण्यात आल्याचे जिल्हाधिकारी पाटील यांनी कळविले आहे.
गोकाक फॉल्सबरोबर (Gokak Falls) जिल्ह्यातील प्रसिद्ध धबधब्यातील निसर्गसौंदर्य पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात. त्याचे रुपांतर दुर्घटनेत घडत आहे. त्यामुळे लक्ष ठेवण्यासाठी वन विभागाचे कर्मचारी आणि गाईड आणि पोलिस नियुक्त केल्याचे त्यांनी सांगितले.
खबरदारीबाबत आवाहनराज्यात उडुपी, कारवार, महाराष्ट्रामध्ये सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि उत्तर व दक्षिण गोव्यात हवामान खात्याकडून अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे पूरसदृशस्थिती उद्भविण्याची दाट शक्यता आहे. यामुळे खानापूरसह जिल्ह्यामध्ये खबरदारी घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. नीतेश पाटील यांनी केले आहे.अतिवृष्टीमुळे पूरस्थितीचा धोका वाढला आहे. यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी खबरदारी घ्यावी. या शिवाय पर्यटक वा ट्रेकिंगनिमित्त जंगलामध्ये जाणे टाळावे. दरड कोसळण्याची शक्यता असते. तसेच डोंगरावर वास्तव्य करणाऱ्यांनी खबरदारी घेण्याचे आवाहन पाटील यांनी केले आहे.