Saturday, July 27, 2024
Homeकोल्हापूरनवरात्रौत्सव : श्री अंबाबाईच्या मुखदर्शनासाठीची रांग महाद्वार रोडवर

नवरात्रौत्सव : श्री अंबाबाईच्या मुखदर्शनासाठीची रांग महाद्वार रोडवर

नवरात्रौत्सव निमित्त करवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या मुखदर्शनासाठी भाविकांना महाद्वार रोडवरून प्रवेश दिला जाणार आहे. याकरिता महाद्वार रोडच्या मध्यभागी दर्शन रांग केली जाणार आहे. त्याची तयारी देवस्थान समितीने सुरू केली असल्याचे देवस्थान समितीचे प्रशासक तथा जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी सांगितले.
नवरात्रौत्सव मध्ये श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी भाविकांना ऑनलाईन बुकिंग करावे लागणार आहे. बुकिंग करून ई-पास उपलब्ध झालेल्यांनाच मंदिरात दर्शनासाठी प्रवेश दिला जाणार आहे. मुखदर्शन मात्र सर्वांसाठी खुले राहणार आहे.
मुखदर्शनासाठी बिनखांबी गणेश मंदिर ते महाद्वार चौक अशी चार पदरी रांग राहणार आहे. बिनखांबी गणेश मंदिरापासून मुखदर्शनासाठी या रांगेत प्रवेश दिला जाणार आहे.
नवरात्रौत्सव मध्ये मुखदर्शनाची रांग रस्त्याच्या मध्यभागी केली जाणार आहे. त्यासाठी बॅरिकेडिंग केले जाईल. या रांगेच्या दोन्ही बाजू मात्र खुल्या असतील. यामुळे महाद्वार रोडवरील सर्व दुकाने सुरू राहतील, त्यासह या मार्गावर ये-जा करणार्या अन्य नागरिकांना रांगेचा अडथळा राहणार नसल्याचे देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांनी सांगितले.
महाद्वारच्या पायर्यांजवळ स्टेज घातले जाणार आहे. त्या ठिकाणी गर्दी होणार नाही, त्यातून धक्काबुक्की आदीसारखे प्रकार होऊ नये याकरिता पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.
मुखदर्शनासाठी भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. भाविकांना मंदिराच्या महाद्वाराच्या पायर्यांपासूनच दर्शन घ्यावे लागणार आहे. भाविकांना दर्शन योग्यप्रकारे घेता यावे, याकरिता सध्या बंद असलेले महाद्वार खुले करण्यात येणार आहे. या ठिकाणी असणार्या पायर्यांच्या पातळीनुसार लाकडी स्टेज घालण्यात येणार आहे. त्यावरून भाविकांना मुखदर्शन घेण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.
अंबाबाई मंदिरात नवरात्रौत्सवात होणार्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ऑनलाईन बुकिंग केलेल्या भाविकांनाच मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे. श्रीपूजकांनीही या नियमावलीचे पालन करावे. मंदिरात आपल्यासोबत भाविक अथवा कुटुंबातील व्यक्तींना आणू नये, असे देवस्थान समितीचे प्रशासक तथा जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी स्पष्ट केले.
देवस्थान समिती कार्यालयात रेखावार यांनी रविवारी श्रीपूजक आणि पोलिस प्रशासनाची बैठक घेतली. रेखावार म्हणाले, श्रीपूजक आणि पोलिस यांच्यात समन्वय ठेवा. मंदिरात दर्शनासाठी येणार्या भाविकांनाही ओटी अथवा पूजेचे कोणत्याही प्रकारचे साहित्य सोबत नेता येणार नाही. त्याच पद्धतीने श्रीपूजकांनीही भाविकांकडून ओटी अथवा पूजेचे साहित्य मंदिरात नेऊ नये. मंदिरात जे देवीचे दैनंदिन धार्मिक विधी होतात, ते करावेत, अन्य अभिषेक करू नयेत, असेही त्यांनी सांगितले.नवरात्रौत्सवात श्रीपूजकांसोबत भाविक मंदिरात जात असतात. यावर्षी मात्र श्रीपूजकांना मंदिरात आपल्यासोबत भाविकांना घेऊन जाता येणार नाही. यासह कुटुंबातील व्यक्तींनाही सोबत घेऊन जाऊ नका, असे आवाहनही त्यांनी केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -