Saturday, July 27, 2024
Homeब्रेकिंगप्रभू रामचंद्रांचे दर्शन घडवून आणतो, सांगत महिलेची अडीच लाखाची फसवणूक

प्रभू रामचंद्रांचे दर्शन घडवून आणतो, सांगत महिलेची अडीच लाखाची फसवणूक

 

 

‘आम्ही तुम्हाला श्रीरामाचे दर्शन घडवून आणतो’,असे सांगून एका 56 वर्षीय महिलेची लाखो रुपयांची फसवणूक करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. तीन भामट्यांनी या महिलेला फसवले. प्रकरणी कल्याण खडकपाडा पोलीसांनी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करत आरोपींचा शोध सुरू केला आहे.येत्या 22 जानेवारीला अयोध्येत राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होणार आहे. त्यासाठी उत्साहात सर्वत्र तयारी सुरू असून देशभरातील अनेक नामवंत नागरिक या सोहळ्यासाठी येणार आहेत. या निमित्त विविध राज्यांत सुट्टीही जाहीर करण्यात आली आहे.

या सोहळ्याला आता अवघे काहीच दिवस उरले असून देशभर भक्तीभावाचे वातावरण निर्माण झाले आहे. देशभरातील नागरिक या सोहळ्यासाठी उत्सूक आहेत.मात्र नागरिकांच्या याच विश्वासाचा गैरफायदा घेऊन त्यांची फसवणूक करण्याचा प्रकार कल्याणमध्ये घडला आहे. ‘आम्ही तुम्हाला श्रीरामाचे दर्शन घडवून आणतो’,असे सांगून एका 56 वर्षीय महिलेची लाखो रुपयांची फसवणूक करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. तीन भामट्यांनी या महिलेला फसवत तिच्याकडील अडीच लाखाचा ऐवज लंपास करत धूम ठोकली. याप्रकरणी कल्याण खडकपाडा पोलीसांनी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करत आरोपींचा शोध सुरू केला आहे.

अशी केली फसवणूककल्याण पश्चिम येथील खडकपाडा भागातील लोटस डेंटल केअर सेंटरसमोर त्याच भागात राहणाऱ्या 56 वर्षीय महिलेच्या बाबतीत फसवणुकीचा हा प्रकार घडला आहे. पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला बुधवारी दुपारी खडकपाडा भागातून पायी चालली होती. यावेळी त्यांना तीन भामट्यांनी अडवले. आम्ही राम भक्त आहोत, आम्ही तुम्हाला प्रभू रामचंद्रांचे दर्शन घडवून आणतो, असे त्यांनी त्या महिलेला सांगितलं. त्यासाठी तुम्ही तुमच्या हातातील सोन्याच्या बांगड्या, इतर सोन्याचा ऐवज पिशवीत गुंडाळून ठेवा, असेही भामट्यांनी तिला सुचवलं.

त्या महिलेने त्या तीन भामट्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवाला आणि तिच्याकडील जवळपास 2 लाख 66 हजाराचा सोन्याचा ऐवज पिशवीत गुंडाळला. हा ऐवज कुणी चोरू नये म्हणून भामट्यांनी स्वतःकडे ठेवून घेतला. आपणास रामाचे दर्शन होत आहे या आनंदात ती महिला होती.

तेवढ्यात तिन्ही भामट्यांनी संधी साधली आणि त्या महिलेला एकाकी सोडून तेथून पळ काढला. आपली फसवणूक झाल्याचे त्या महिलेच्या लक्षात आले आणि ती हादरली. मात्र तिने कसाबसा धीर एकवटला आणि खडकपाडा पोलिस ठाण्यात धाव घेऊन तेथे सर्व प्रकार कथन करत तक्रार दाखल केली. तिच्या फिर्यादीनंतर खडकपाडा पोलीस ठाण्यात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी फौजदार तानाजी वाघ आणि त्यांचे सहकारी तिघा फरार भामट्यांचा शोध घेत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -