Thursday, September 19, 2024
Homeराजकीय घडामोडीराहुल गांधी यांच्यावर हल्ला करण्याचे षडयंत्र; संजय राऊत यांच्या दाव्याने खळबळ

राहुल गांधी यांच्यावर हल्ला करण्याचे षडयंत्र; संजय राऊत यांच्या दाव्याने खळबळ

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आरक्षणाबद्दल विधान केल्याने गदारोळ उठला आहे. राहुल गांधी यांचे विधान अर्धवट दाखवून काँग्रेस आरक्षण विरोधी असल्याचं सांगितलं जात आहे. या मुद्द्यावरून राहुल गांधी यांच्याविरोधात चिथावणीही दिली जात आहे. त्यामुळे काँग्रेस नेतेही आक्रमक झाले आहेत. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एक नवाच दावा केल्याने खळबळ उडाली आहे. राहुल गांधी यांच्यावर हल्ला करण्याचे षडयंत्र रचलं जात आहे. राहुल यांच्या जीवाला धोका आहे, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

 

खासदार संजय राऊत हे मीडियाशी संवाद साधत होते. राहुल गांधी यांच्यावर हाल्ला करण्याचे षडयंत्र रचले जात आहे. दोन दिवसांपासून काही गोष्टी समोर येत आहेत. उत्तर प्रदेशचे एक मंत्री, महायुतीचे एक आमदार हीच भाषा करत आहेत. राहुल गांधी यांना कोणी त्यांना आतांकवादी म्हणत आहेत, कोणी त्यांची जीभ छाटत आहे. जे रशियात होते ते आता इथे होत आहे. विरोधकांना संपवण्याची भाषा केली जात आहे, असं संजय राऊत म्हणाले.

 

आम्हाला धमक्या येत आहेत

तुमचे लोक सातत्याने धमक्या देत आहेत आणि यावर सत्ताधाऱ्यांकडून कारवाई केली जात नाही. पंतप्रधान, गृहमंत्रीही त्यांच्यावर कारवाई करत नाहीत. म्हणजेच तुम्हीही त्यांच्यासोबत आहात. या धमक्यांमुळे राहुल गांधी यांच्या जिवाला धोका आहे, असं संजय राऊत यांनी सांगितलं.

 

चीड, तडफड समजून घ्या

 

आम्हाला केंद्र सरकार आणि भाजपची चीड तसेच तडफड समजून घेतली पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या घरी जाऊन संविधान संपवले आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

 

आज आमची बैठक

 

आज आमची महाविकास आघाडीची बैठक आहे. या बैठकीला इतर लहान पक्ष देखील येणार आहेत. तिन्ही पक्षाचे नेतेही येणार आहेत. काँग्रेस नेते व्यस्त आहेत. पण त्यांना आम्ही बैठकीला आलं पाहिजे, असं सांगितलं आहे, असंही त्यांनी म्हटलंय.

 

बोंडे काय म्हणाले?

 

दरम्यान, भाजपचे राज्यसभेतील खासदार अनिल बोंडे यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका केली होती. राहुल गांधी यांच्या जीभेला चटके दिले पाहिजे असं म्हटलं होतं. तर शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी राहुल गांधी यांची जीभ छाटणाऱ्याला 11 लाखाचं बक्षीस देणार असल्याचं जाहीर केलं होतं. त्यामुळे गदारोळ उठला आहे. देशात सामाजिक समता निर्माण झाल्यावर आम्ही आरक्षण रद्द करू. पण अजून ती वेळ आली नाही, असं विधान राहुल गांधी यांनी केलं होतं. त्यावरून हा गदारोळ उठला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -