Friday, October 18, 2024
Homeब्रेकिंगशेतमालाचे दर वाढले की सरकारच्या पोटात गोळा येतो, कांद्याच्या आयातीवरुन जयंत पाटलांचा...

शेतमालाचे दर वाढले की सरकारच्या पोटात गोळा येतो, कांद्याच्या आयातीवरुन जयंत पाटलांचा हल्लाबोल

भारतातील कांद्याचे वाढते (Onion Price) दर नियंत्रणात आणण्यासाठी सरकारनं अफगाणिस्तानातून (Afghanistan) कांद्याची आयात केली आहे. याच मुद्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. शेतकऱ्याचे (Farmers) कुठेही उत्पन्न वाढू नये अशी सरकारची नीती असल्याचे पाटील म्हणाले. तेलबियांच्या आयातीबद्दल, तेल आयात करण्याच्या बाबतीत हेच धोरण आहे. शेतीमालाचा दर वाढायला लागला की यांच्या पोटात गोळा येतो आणि महागाई वाढली असे समजतात असं पाटील म्हणाले. शेतीमालाचा कसा दर पडेल यासाठी जगातून कांदा, सोयाबीनचे तेल हुडकून काढतात आणि शेतकऱ्याचं कंबरडं मोडतात अशी टीका जयंत पाटील यांनी केली.

 

सध्या कांद्याचे दर वाढत आहेत. यामुळं शेतकऱ्यांच्या खिशात चार पैसे येत आहेत. अशा स्थितीतच सरकारने अफगाणिस्तानचा लाल कांदा आयात केला आहे. भारतात कांद्याचे वाढत असलेले दर अन् अफगानिस्तानमध्ये घसरलेले दर याचा फायदा घेत खासगी व्यापारी कांदा भारतात आणून मालामाल बनू पाहत आहेत.

 

लोकसभेप्रमाणेच विधानसभेत देखील सरकारला कांदा रडवणार

दरम्यान, लोकसभेप्रमाणेच विधानसभेत देखील सरकारला कांदा रडवणार का? असा सवाल जयंत पाटील यांना प्रसारमाध्यमांनी केला. यावेळी पाटील म्हणाले की, कांदा रडवणार, सोयाबीन रडवणार, कपाशी रडवणार, तसेच सर्व पिक विमांचे प्रश्न सरकारला रडवणार असल्याचे जयंत पाटील म्हणाले. सरकारने कितीही घोषणा केल्या तरी महाराष्ट्रातील ग्रामीण भागात फिरलं की तुमच्या लक्षात येईल या सरकारला लोक मत देणार नसल्याचे जयंत पाटील म्हणाले.

आम्ही विरोधी पक्षात, मराठा आरक्षणासंदर्भात सत्तारुढ पक्षाने निर्णय घ्यावा

आम्ही सध्या विरोधी पक्षात आहोत. जे सत्तेत आहेत त्यांच्याकडूनच मराठा आरक्षणासंदर्भात मोठ्या अपेक्षा असल्याचे जयंत पाटील म्हणाले. सत्तारुढ पक्षाने निर्णय घ्यावा आम्ही त्याला पाठिंबा द्यायला तयार असल्याचे पाटील म्हणाले.

 

महाविकास आघाडीत येवल्याची जागा आम्हाला मिळणार

येवल्याच्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार होते. त्यामुळे ही जागा बहुतेक आम्हाला मिळणार असल्याचे जयंत पाटील म्हणाले. महाविकास आघाडीचा अंतिम निर्णय होईल त्यावेळी तसे घोषीत केले जाईल असंही पाटील म्हणाले. त्यामुळं याठिकाणी राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी लढ अशीच लढत होईल असं जयंत पाटील म्हणाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -