राज्यात तापमानाचा पारा भयानक वाढलाय. फेब्रुवारी महिन्यातच सूर्य आग ओकतोय. राज्यभरात तीव्र तापमानाचे अलर्ट देण्यात आले असून कमाल तापमानाचा पारा 35-38 अंशांपर्यंत राहणार असल्याचं सांगितलं जातंय. उन्हाची तीव्रता वाढली असून रखरखत्या उन्हाचा त्रास झाल्याने सोमवारी सांगलीत उष्माघाताचा पहिला बळी गेला. उष्णतेची धग आता चांगलीच जाणवू लागलीय. मुंबईत सोमवारी (24) सांताक्रूझ भागात दुपारी कमाल तापमान 38.40 अंश सेल्सियस नोंदवण्यात आले.भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, राज्यात मुंबईसह कोकणपट्ट्यात सध्या प्रचंड उष्ण आणि आर्द्र हवामानाच्या नोंदी होत असून नागरिकांना प्रचंड उकाडा आणि उन्हाच्या झळांना सामोरं जावं लागणार आहे.
पुणे विभागाचे IMD प्रमुख के. एस. होसाळीकर यांनी आपल्या X माध्यमावर शेअर केलेल्या पोस्टनुसार, मुंबईकरांना उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला असून समुद्री पश्चिमी वाऱ्यांच्या प्रभावामुळे दुपारी 1 नंतर कमाल तापमानात वाढ होणार आहे.
हवामान विभागाचा अंदाज काय?
राज्यात उन्हाळा सुरु झाला असून गेल्या काही दिवसांपासून मुंबई शहरासह राज्यभर दिवसा तापमानाचा पारा प्रचंड वाढतोय. 37 अंश सेल्सियसहून अधिक तापमान वाढत आहे. आयएमडी ने दिलेल्या अंदाजानुसार, पुढील तीन दिवसांत कोकणातील बहुतांश भागात प्रचंड उष्णता वाढणार आहे. राज्यात पावसाची शक्यता नाही. परिणामी उर्वरित ठिकाणी कोरडे व शुष्क हवामान असेल.ठाणे, पालघर, मुंबई, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांना आज (25)उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला असून हवामानाचे यलो अलर्ट देण्यात आले आहेत. उद्याही उष्णतेची लाट कायम राहणार असून तापमान चढेच राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी उन्हापासून योग्य ती काळजी घेण्याचा सल्ला हवामान विभागाने दिला आहे.
सोमवारी कुठे काय तापमानाची नोंद?
महाराष्ट्रात 24 फेब्रुवारी 2025 रोजी सर्वाधिक तापमान शहादा (नंदुरबार) येथे 41.9 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. यानंतर कराड (सातारा) येथे 40.6 अंश आणि पालघर येथे 40.2 अंश तापमानाची नोंद झाली. पुण्यातील तळेगावमध्ये 38.3 अंश तर सोलापुरात 38.6 अंश तापमान होते. लोनावळा येथे 37.9 अंश तर मुंबई सांताक्रूझ येथे 37.3 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. औरंगाबादमध्येही तापमान 36.8 अंश इतके होते. राज्यातील काही भागांत तापमान 40 अंशांच्या पुढे गेल्याने उन्हाचा चटका जाणवू लागला आहे. पुढील काही दिवस उन्हाचा तडाखा वाढण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सावधगिरी बाळगावी.