शहरातील महाल, भालदारपुरा, हंसापुरी भागातील घटनेनंतर सध्या तणावपूर्ण शांतता असून यामध्ये व्यापाऱ्यांचे किमान अडीचशे ते तीनशे कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
हा बराचसा भाग ठोक बाजारपेठेचा आहे. समोर रमजान, गुढीपाडव्याचा सण असताना हे नुकसान झाल्याने व्यापारी चिंतेत आहेत. रोज तीन हजारावर पोलिस अलर्ट मोडवर आहेत. उपराजधानीत कोतवाली, गणेशपेठ, तहसील, सक्करदरा, नंदनवन अशा १२ पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये संचारबंदी अजून कायम आहे.
सुमारे 170 शाळा अजूनही बंद आहेत. 11 मार्गावर शहर बस सेवा देखील ठप्प झाली आहे. कुठलीही अनुचित घटना गेल्या दोन दिवसात घडली नसली तरी ही घटना घडविण्यामागे कोण कोण आहेत ते हात शोधण्याच्या कामी पोलीस यंत्रणा कसोशीने लागलेली आहे. संचारबंदी नसलेल्या भागातील काही शाळांनी वर्ग भरल्यानंतर नियमित शाळा सुटण्याच्या वेळेपूर्वीच खबरदारीचा उपाय म्हणून सुट्टी दिल्याने पालकांची मंगळवारी तारांबळ उडाली.
आवश्यकतेनुसार शाळांना सुटीबाबतचे अधिकार शिक्षण विभागाकडून मुख्याध्यापकांना बहाल करण्यात आले आहेत. या गोंधळामुळे पालकांसोबतच स्कूल व्हॅन-बस चालकांची चांगलीच तारांबळ उडाली.