मुंबईत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून (MNS) आज (26 एप्रिल) प्रतिपालिका सभागृह भरवण्यात येणार आहे. मुंबई महापालिकेच्या समोरील पत्रकार भवन येथे मनसेचे प्रतिसभागृह भरणार आहे. लोकप्रतिनिधी नसल्यामुळे लोकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप मनसेने केला आहे. त्यामुळे प्रतिपालिका भरवून मनसे समस्यांकडे लक्ष वेधणार आहे. मनसेचे यासाठी मनसेने विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांना आमंत्रित केले होते.
मनसेकडून ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे आणि भाजपचे नेते आशिष शेलार यांना पत्र लिहून मनसेच्या प्रतिसभागृहासाठी आमंत्रण दिले होते. परंतु मनसेकडून भरवण्यात येणाऱ्या प्रतिसभागृहात सहभागी होण्यास भाजपने नकार दिला आहे. शिवसेना ठाकरे गटालाही प्रतिसभागृहासाठी मनसेने आमंत्रित केल्याने भाजपने सहभागी होण्यास नकार दिला आहे. भाजपने पत्र लिहित याबाबत आपली भूमिका मांडली आहे.
भाजपाने पत्रात काय म्हटलंय?
प्रति, मा. श्री. संदीप देशपांडे मुंबई शहर अध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना
दादर, मुंबई- ४०००२८
विषय :- आपले दिनांक २१ एप्रिल २०२५ चे महापालिका प्रतिसभागृहाबाबतचे पत्र….
महोदय, आपले उपरोक्त विषयाबाबतचे निमंत्रण आम्हाला मिळाले. निमंत्रणाबाबत आभार….
ज्या उबाठा गटाने गेली २५ वर्षे मुंबई महापालिकेत पराकोटीचा भ्रष्टाचार केला ज्यामुळेच मुंबईतील समस्यांनी आक्राळ विक्राळ रूप धारण केले आहे; त्यांच्याच सोबत मुंबईकरांच्या समस्यांबावत चर्चेत सहभागी होऊन काय साध्य होईल? असा स्वाभाविक प्रश्न आमच्या पक्षांतर्गत चर्चेअंती उपस्थित झाला. मुंबईकरांचे जीवनमान सुसह्य करण्यासाठी आणि समस्यांवर तोडगा काढण्यासाठी मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार, मुंबईचे मंत्री महोदय, आमदार, वरिष्ठ नेते, लोकप्रतिनिधी व आम्ही सर्व भाजपा नगरसेवक सातत्याने रस्त्यावर उतरून सातत्याने प्रयत्नशील आहोतच. मुंबईतील रस्त्यांच्या दर्जाबाबत आणि कामात होणाऱ्या विलंबाबाबत भाजपा आमदार, लोकप्रतिनिधी यांच्या तक्रारीची गंभीर दखल घेऊन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाची प्रदीर्घ बैठक घेऊन दि. ३१ मे २०२५ पूर्वी चालू कामे पूर्ण करण्याचे सकारात्मक निर्देश दिलेले आहेत. दरवर्षी प्रशासनाच्या बाले सफाईबाबतच्या दाव्याची प्रत्यक्ष नाल्यावर जाऊन पाहणी मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार व भाजपाचे लोकप्रतिनिधी करत आहेत. आशिष शेलार, पालकमंत्री मुंबई उपनगर मंगलप्रभात लोढा, सह पालकमंत्री हे आरोग्य, कचरा व्यवस्थापन, आपत्कालीन व्यवस्थापन, महापालिका विविध प्रकल्प वाक्षाबत वेळोवेळी आढावा बैठका घेत आहेत. वरील वस्तुस्थिती लक्षात घेता महापालिका प्रतिसभागृहात २५ वर्षे पराकोटीचा भ्रष्टाचार करणाऱ्यांसोबत चर्चेत सहभागी होण्यापेक्षा भाजपा रस्त्यावर उतरून मुंबईकरांच्या समस्या सोडविण्यासाठी यापूर्वी प्रमाणेच सातत्याने अग्रेसर व कटिबद्ध राहील. पुनश्च एकदा आपल्या निमंत्रणाबद्दल आभार, असं पत्र भाजपचे मा. गटनेते प्रभाकर शिंदे यांनी संदीप देशपांडेंना पाठवलं आहे.
मनसेनं निमंत्रण पत्रात काय म्हटले होते?
मुंबई महानगरपालिका ही दोन चाकांवर चालते. एक प्रशासन आणि एक लोकप्रतिनिधी, पण गेल्या तीन वर्षांपासून यातील लोकयतिनिधी हे चाक बंद झाले आहे. मुंबईत अनेक समस्या आहेत, ज्यावर चर्चा व्हावी, मार्ग निघावा अशी जनभावना आहे. पण महापालिका सभागृह अस्तित्वात नसल्यामुळे ह्या पर्चा होत नाहीत. त्यामुळे ह्या सर्व प्रश्नांवर चर्चा पडवून आणण्यासाठी आम्ही प्रतिसभागृहाची संकल्पना मांडत आहोत. ज्यामध्ये विविध राजकीय संकटना, राजकीय प्रतिनिधी यांनी सहभाग नोंदवावा अशी अपेक्षा आहे. नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांना वाचा फुटावी. महानगरपालिका प्रशासनाला या प्रश्नांची जाणीव व्हावी व त्यावर मार्ग निघावा यासाठी हे चर्चचे व्यासपीठ आहे. राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून फक्त नागरिकांच्या समस्यांवर चर्चा व्हावी हा उद्देश आहे, असे मनसेच्यावतीने पाठविण्यात आलेल्या पत्रात म्हटलं आहे.