भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील 9 दहशतवादी तळांवर एअर स्ट्राईक केला. भारताने यासह पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला. ऑपेरशन सिंदूरंनतर आता भारत-पाकिस्तान यांच्यातील तणाव आणखी वाढला आहे. या तणावाचा परिणाम आयपीएल 2025 मधील काही सामन्यांवर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भारताच्या एअर स्ट्राईकमुळे हिमाचल प्रदेशमधील धर्मशाळा क्रिकेट स्टेडियममध्ये आयपीएल 2025 मधील उर्वरित सामने होणार नसल्याचं म्हटलं जात आहे. एचपीसीएच्या या स्टेडियममध्ये गुरुवारी 8 मे रोजी पंजाब किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स यांच्यातील सामना रद्द होणार, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
तसेच 8 मे नंतर 11 मे रोजी याच स्टेडियममध्ये पंजाब विरुद्ध मुंबई यांच्यात सामना होणार आहे. मात्र हे 2 सामने या स्टेडियममध्ये होणार की नाहीत? याबाबत कोणतीही अधिकृत माहिती बीसीसीआय किंवा आयपीएल गव्हर्निंग काउन्सिलकडून देण्यात आलेली नाही. याबाबत हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू यांनी केंद्र सरकारकडून कोणतेही आदेश नसल्याचं स्पष्ट केलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पंजाब विरुद्ध दिल्ली हा सामना सुरक्षेच्या कारणास्तव दुसर्या ठिकाणी खेळवण्यात येऊ शकतो. भारताने पाकिस्तानवर केलेल्या एअर स्ट्राईकनंतर हिमाचल प्रदेशमधील धर्मशाळा येथील गग्गल विमानतळावरून उड्डाणं थांबवण्यात आली आहेत. तसेच हवाई क्षेत्रही बंद केली गेली आहेत.
भारताने केलेल्या एअर स्ट्राईकमुळे मुख्यमंत्री सुक्खू यांच्या कुल्लूमधील बंजारमधील सर्व नियोजित सभा आणि कार्यक्रम रद्द करण्यात आले. अशात या सामन्यासाठी क्रिकेट चाहत्यांची धर्मशाळेतील स्टेडियममध्ये आणि आसपासच्या परिसरात क्रिकेट चाहत्यांची गर्दी होऊ शकते. एचपीसीएच्या स्टेडियमची क्षमता ही 22 हजाराच्या आसपास आहे.
पंजाब विरुद्ध दिल्ली सामन्याबाबत मोठी अपडेट
मुख्यमंत्री सुक्खू काय म्हणाले?
“ज्या ठिकाणी गर्दीचे कार्यक्रम आयोजित केले जात आहेत, तिथे विशेष दक्षता घेतली जात आहे. आज माझाही एक कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमात 4-5 हजार लोकं उपस्थित राहणार होते. मात्र गृह मंत्रालयाच्या निर्देशानुसार पुढील निर्णय घेण्यात आला. सीमेलगतच्या शाळांच्या सुरक्षेचा आढावा घेतला जातोय. त्यानंतर जिल्हा अधिकारी परिस्थितीनुसार निर्णय घेतील” अशी माहिती मुख्यमंत्री सुक्खू यांनी सिमला येथे माध्यमांना दिली.