रेल्वे स्टेशनवर 4 मुलं आणि एका महिलेला तडफडताना पाहून तिथं उपस्थित असलेल्या सर्वांमध्ये एकच खळबळ माजली. तडफडणाऱ्या मुलांना पाहून काही वेळ तेथे गोंधळ उडाला. कुणाला काही समजेपर्यंत परिस्थिती बिघडायला लागली.
त्यानंतर रेल्वे पोलीस दलाच्या (RPF) जवानांनी सर्वांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात नेले. तेथे उपचारादरम्यान तीन मुलांचा मृत्यू झाला. महिला आणि एका मुलाची प्रकृती अजूनही गंभीर आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. हृदय पिळवटून टाकणारी ही घटना बिहारमधील औरंगाबाद जिल्ह्यातील रफीगंज रेल्वे स्टेशनवर घडली. या महिलेनं तिच्या चार मुलांसह रेल्वे स्टेशनवर विष प्राशन केले.
का उचलले टोकचे पाऊल?
बिहारमधल्या औरंगाबाद येथील रफीगंज रेल्वे स्टेशनवरील ही धक्कादायक घटना आहे. औरंगाबादमध्ये नवऱ्याशी झालेल्या भांडणानंतर एका महिलेने आपल्या चार मुलांसोबत स्वतःही विष घेतले. ही घटना रफीगंज रेल्वे स्टेशनच्या डाऊन प्लॅटफॉर्मवर घडली. पाच जणांना तडफडताना पाहून आरपीएफने स्थानिक लोकांच्या मदतीने सर्वांना रफीगंज सीएचसीमध्ये पोहोचवले, जिथे उपचारादरम्यान 3 मुलांचा मृत्यू झाला.
तर महिला आणि एका मुलाला प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी औरंगाबाद सदर रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.
एक, दोन आणि तीन वर्षांच्या तीन मुलांचा मृत्यू
सोनिया देवी असं या महिलेचं नाव आहे. ती झिकाटिया गावचे रहिवाशी रवी बिंद यांची पत्नी आहे. तर मृतांमध्ये एक वर्षांची राधा, दोन वर्षांचा सूर्यमणी आणि तीन वर्षांच्या शिवानीचा समावेश आहे. सीएचसी प्रभारी डॉ. अरविंद कुमार यांनी सांगितले की, विष प्राशन केल्यामुळे तीन मुलांचा मृत्यू झाला आहे.
घटनेनंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. सध्या तीनही मृतदेह रेल्वे पोलिसांच्या देखरेखेखाली शवविच्छेदनासाठी सोननगरला पाठवण्यात आले आहेत.