Saturday, May 31, 2025
Homeराजकीय घडामोडीमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया; मुख्यमंत्री सांगतील ते काम..

मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया; मुख्यमंत्री सांगतील ते काम..

“मुख्यमंत्री देतील ते खातं मला चालेल. सरकार जी जबाबदारी देईल ती मी पार पाडेन. मी कोणत्याची खात्याची अपेक्षा केलेली नाही,” अशी पहिली प्रतिक्रिया राष्ट्रावादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर दिली. नाराज असलेल्या भुजबळांचं अखेर राज्याच्या मंत्रिमंडळात कमबॅक झालं आहे. त्यांनी आज (मंगळवार) मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार उपस्थित होते. प्रचंड बहुमतानं सत्तेत आलेल्या महायुती सरकारच्या मंत्रिपदाच्या पहिल्या यादीत छगन भुजबळ यांचं नाव नव्हतं. मंत्रिपद न मिळाल्याने भुजबळांनी वेळोवेळी नाराजी बोलून दाखवली होती. त्यानंतर घडलेल्या बीड प्रकरणामुळे धनंजय मुंडेंना राजीनामा द्यावा लागला होता. मुंडेंच्या खात्यावर भुजबळांची वर्णी लागेल अशी चर्चा होती. त्यानंतर आता पुन्हा छगन भुजबळांची कॅबिनेट मंत्रिपदी वर्णी लागली आहे.

 

“शेवट चांगला असेल तर सगळं चांगलं अशी इंग्रजीत एक म्हण आहे. 1991 पासून मी विविध खाती सांभाळली आहेत. विविध विभागांचा कारभार मी पाहिलेला आहे. गृहमंत्रिपदापासून विविध जबाबदाऱ्या मी सांभाळल्या आहेत. त्यामुळे आता मुख्यमंत्री देतील ते खातं मला चालेल. सरकार जी जबाबदारी देईल ती मी पार पाडेन. मी कोणत्याची खात्याची अपेक्षा केलेली नाही,” असं भुजबळ म्हणाले. “नाशिक जिल्ह्यात, येवल्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. त्यासंदर्भात मी मुख्यमंत्री आणि इतरांशीही बोलणार आहे. त्यातून शेतकऱ्यांना काय मदत करता येईल, हे पाहू. त्यांना तातडीची मदत करण्याची गरज आहे, असं मला वाटतं. त्यासाठी मी प्रयत्न करेन”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

 

तुमच्या शपथविधीबद्दल काहींनी नाराजी व्यक्त केली होती, त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे, असा सवाल केला असता स्मित हास्य करत भुजबळ म्हणाले, “त्यांचे मी आभार मानतो.”

 

मंत्रिपद न मिळाल्याने छगन भुजबळ हे नाराज होते. वेळोवेळी त्यांनी शेरो-शायरींच्या माध्यमातून ही नाराजी बोलून दाखवली होती. मात्र आता मंत्रिमंडळात स्थान मिळाल्यानंतर त्यांची नाराजी पूर्णपणे दूर झाली आहे. मधल्या काळात भुजबळ हे सतत देवेंद्र फडणवीसांच्या भेटीगाठी घेत होते. अजित पवारांवर त्यांची खास नाराजी होती. ज्या ज्या वेळी नाशिक किंवा आजूबाजूच्या परिसरात त्यांचे बॅनर किंवा पोस्टर लागायचे, त्यावरसुद्धा अजित पवारांचा फोटो नसायचा. त्यामुळे भुजबळांच्या मनात नेमकं चाललंय तरी काय, अशी जोरदार चर्चा होती. मात्र आता बीडमधील प्रकरणानंतर धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर रिक्त झालेलं खातं कोणाकडे जाणार, याकडे सर्वांचं लक्ष वेधलं होतं. अजित पवारांनी ते खातं स्वत:कडे ठेवलं होतं. आता ते मंत्रिपद छगन भुजबळांना देण्यात आलं आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -