Thursday, June 26, 2025
Homeकोल्हापूरनाट्यपूर्ण घडामोडीनंतर 'गोकुळ'च्या अध्यक्षपदासाठी 'हे' नाव आलं चर्चेत; बैठकीत आज शिक्कामोर्तब होण्याची...

नाट्यपूर्ण घडामोडीनंतर ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदासाठी ‘हे’ नाव आलं चर्चेत; बैठकीत आज शिक्कामोर्तब होण्याची शक्यता!

नाट्यपूर्ण घडामोडीनंतर ‘गगेल्या चार-पाच दिवसांतील नाट्यपूर्ण घडामोडीनंतर ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदी (Gokul President Election) सर्वमान्य चेहरा म्हणून शशिकांत पाटील-चुयेकर यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.

 

संघाचे संस्थापक दिवंगत आनंदराव पाटील-चुयेकर यांचे पुत्र हा निकष त्यासाठी महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे. आज (ता. २०) संघाचे नेते मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif), आमदार डॉ. विनय कोरे, सतेज पाटील यांच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी होणाऱ्या बैठकीनंतर या नावाची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे.

 

दरम्यान, संघात अध्यक्षपदाला मोठा मानसन्मान आहे. त्यामुळे अध्यक्ष हा आपल्यापेक्षा वरचढ असू नये, ही रणनीतीही चुयेकर यांना मान्यता देताना आखल्याचे बोलले जाते. ‘गोकुळ’ चा अध्यक्ष महायुतीचा करावा, अशी भूमिका मुख्यमंत्री फडणवीस व उपमुख्यमंत्री शिंदे यांनी घेतल्याचे सांगत विद्यमान अध्यक्ष अरुण डोंगळे (Arun Dongle) यांनी ठरलेल्या वेळेत राजीनामा देण्यास नकार दिला होता.

 

डोंगळे यांच्या या भूमिकेनंतर संघाचे १९ संचालक एकत्र येऊन त्यांनी डोंगळे यांच्याच बंडाला सुरूंग लावण्याचा प्रयत्न केला. पण, त्यानंतरही डोंगळे राजीनामा न देण्यावर ठाम होते. माझ्या राजीनाम्यापेक्षा सर्वमान्य चेहरा आणि महायुतीचा कोणीही अध्यक्ष करा, या भूमिकेवर ते ठाम होते. त्यातून संस्थापकांचा मुलगा म्हणून शशिकांत पाटील-चुयेकर यांचे नाव पुढे आले आहे. या नावाला श्री. डोंगळे संमती देणार का नाही, याचाही निर्णय उद्याच होण्याची शक्यता आहे.

 

चुयेकर-पाटील हे पहिल्यांदाच संचालक मंडळात आले आहेत. यापूर्वी त्यांच्या आई दिवंगत जयश्री पाटील-चुयेकर या संचालक होत्या. जिल्ह्याच्या राजकारणात श्री. चुयेकर हे आमदार सतेज पाटील यांचे कार्यकर्ते आहेत. त्यामुळे सर्वमान्य चेहरा म्हणून त्याचे नाव पुढे आले असले तरी ते अध्यक्ष झाले, तरी आमदार पाटील यांचा अध्यक्ष झाला, असे संदेश जिल्ह्याच्या राजकारणात जाणार आहे.

 

पण, आमदार चंद्रदीप नरके, संचालक अमरसिंह पाटील यांचे ते नातेवाईक आहेत, ही या पदावर त्यांचे नाव निश्‍चित होण्यासाठी जमेची बाजू आहे. पूर्वी या पदासाठी बाबासाहेब चौगले यांचे नाव आघाडीवर होते. पण, त्यांच्यावरही आमदार पाटील गटाचा शिक्का असल्याने आणि ते अध्यक्ष झाले, तर आमचे ऐकणार का? हा प्रश्‍न डोंगळे यांच्यासह विश्‍वास पाटील यांच्यासमोर होता. त्यातून त्यांच्या नावाला विरोध झाल्याची चर्चा आहे.

 

गठ्ठा मतदान हीच ताकद

 

‘गोकुळ’ची निवडणूक पुढील वर्षी आहे. या निवडणुकीत ज्या संचालकांकडे एकगठ्ठा मतदार आहेत, त्यांची ताकद जास्त समजली जाते. सद्यस्थितीत डोंगळे व विश्‍वास पाटील यांच्याकडे सर्वाधिक ठरावदार आहेत. याच ताकदीवर डोंगळे यांनी नेत्यांना आव्हान दिले आहे. या त्यांच्या दबावतंत्रामुळेच नेत्यांनाही डोंगळे यांच्या भूमिकेपुढे नमते घेण्याची वेळ आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -