जिल्ह्यातील काही भागात आज पुन्हा वळवाने जोरदार (Kolhapur Rain) तडाखा दिला. शिरोळ आणि परिसरात ढगफुटीसदृश पाऊस पडला. त्यामुळे फळबागांचे नुकसान झाले. काही भागात ऊसही आडवा झाला.
सततच्या पावसाने उसाची भरणी खोळंबली. भुईमुगाचेही काही ठिकाणी नुकसान झाले.
कोल्हापूर शहराच्या दक्षिण भागातील उपनगरात पाऊस पडला. मात्र, मध्यवर्ती भागात तुरळक पाऊस झाला. जिल्ह्यात बहुतांशी ठिकाणी वृक्ष कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. महापालिका हद्दत एका दिवसात ४० झाडे पडली. जिल्ह्यातील बहुतांशी भागात वीजपुरवठा खंडित झाला होता. महावितरणच्या (Kolhapur Municipal Corporation) कर्मचाऱ्यांनी अनेक भागातील वीजपुरवठा सुरळीत केला.
भाजीपाला पिकात पाणीच पाणी
जयसिंगपूर : मॉन्सूनपूर्व पावसाने शिरोळ तालुक्यात दाणादाण उडवून दिली आहे. खरिपाची कामे ठप्प झाली असून, पेरण्याही लांबणीवर पडणार आहेत. दोन दिवस सुरू असलेल्या मुसळधार मॉन्सूनपूर्व पावसाने शेती पिकांमध्ये सरी पाण्याने भरून राहिल्या आहेत. मॉन्सूनला अद्याप दोन आठवडे शिल्लक असताना दोन दिवसांच्या मॉन्सूनपूर्व पावसाने दैना उडाली आहे. ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसामुळे जयसिंगपूरसह शिरोळ तालुक्यातील सर्वच गावांमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने विद्युतपुरवठा खंडित करण्यात येत आहे. महावितरणने मॉन्सूनपूर्व कामे केली आहेत. ऊस पिकाला हा पाऊस पोषक असला तरी अतिपावसाचा दुष्परिणाम पिकावर होऊ शकतो.
सध्या भाजीपाला पिकाला हा पाऊस अतिरिक्त ठरत आहे. वांगी, टोमॅटो, दोडका, गवार, काकडी या पिकांमध्ये पाणी साचून राहिले आहे. आणखी चार दिवस अशीच स्थिती राहिली तर भाजीपाला पीक पिवळे पडण्याचा धोका आहे. अनेक ठिकाणी उन्हाळी भुईमूग काढण्याची कामे सुरू असताना सुरू झालेल्या मॉन्सूनपूर्व पावसाने ही कामे ठप्प झाली आहेत. शेतकऱ्यांनी भुईमूग उपसून बोदावर ठेवले आहे. भुईमूग तोडणीचे कामे सुरू होण्याआधीच पावसाने सुरुवात केल्याने उपसून टाकलेला भुईमूग पावसाच्या पाण्यात भिजत आहे.
गावागावातील आठवडी बाजार पावसामुळे विस्कळीत झाला आहे. शिवाय रिपरिप पावसामुळे भाजीपालाही खराब होत आहे. त्यामुळे शेतकरी, व्यापाऱ्यांचे नुकसान होत आहे. शेतशिवारात खरिपाच्या पेरण्यासाठी लगबग सुरू आहे. अशातच मॉन्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांना शेतात लय ठेवणे देखील कठीण बनले आहे. जनावरांच्या चाऱ्याशिवाय अन्य कामे शेतात होताना दिसत नाहीत.
महावितरण कार्यालयात पावसाचे पाणी
मॉन्सूनपूर्व पावसाने शहरात जोरदार हजेरी लावली. वर्दळीच्या लक्ष्मी रोडवर सुमारे दोन फूट पाणी साचल्याने दुचाकीच्या वाहतुकीसाठी मार्ग काही काळ बंद राहिला. महावितरणच्या कार्यालयात पाणी शिरल्याने कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली. राजीव गांधीनगर परिसरात अनेक घरात पाणी शिरले. त्याचबरोबर लक्ष्मी रोडवर अनेक हॉटेलमध्ये पाणी घुसले. रस्ते, नाले, ओढे तुंबून वाहत होते.
जयसिंगपूर शहरात गॅस पाईप, पाणीपुरवठा पाईप, भुयारी गटार योजना शहरात सर्वत्र खड्ड्याची परिस्थिती आहे. याचा सर्वाधिक फटला लक्ष्मी रोड व लक्ष्मी रोडला जोडणाऱ्या कॉलनीला बसला. राजीव गांधीनगरमध्ये जनतारा शाळेच्या पाठीमागील बाजूच्या कंपाउंडलगतच्या असलेल्या घरामध्ये अनेक घरात पाणी घुसले. जयसिंगपूर-उदगाव मार्गावर अनेक रोपवाटिकांचेदेखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.
पंचनामे करा; भरपाई द्या
मॉन्सूनपूर्व पावसाने शिरोळ तालुक्यातील शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. महसूल विभागाने नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.
पारगाव, अंबप परिसरात ओढे, नाल्यांना पाणी
घुणकी : किणी, घुणकी, चावरे, तळसंदे, पारगाव, निलेवाडी, मनपाडळे, पाडळी, अंबप, वाठार परिसराला आज सलग अकराव्या दिवशी अडीच तासांहून अधिक वेळ ढगफुटी सदृश पाऊस झाल्याने ओढे, नाल्याना मोठे पाणी आले. ओढ्यांचे पाणी शेतात शिरल्याने माती वाहून जाऊन शेतकऱ्यांचे नुकसान झाले.
आज दुपारपर्यंत पावसाचे वातावरण नव्हते. मात्र, दुपारी दोनच्या सुमारास आकाशात काळेकुट्ट ढग जमा होऊन ढगफुटी सदृश पावसाने सुरुवात केली. काही वेळातच धो- धो पडणाऱ्या पावसाने सर्वत्र पाणीच पाणी झाले. मनपाडळे येथील तलावामध्ये उगम असलेला ओढा अंबप- वाठार- किणी- घुणकी मार्गे वारणा नदीमध्ये समाविष्ट होतो. या ओढ्याला मिळणाऱ्या तळसंदे, पारगाव परिसरातील ओढ्यांनाही मोठे पाणी आले. या ओढ्यांचे पाणी शेतात घुसून शेतकऱ्यांचे नुकसान झाले.
दरम्यान, दुपारी तीनच्या सुमारास वाठार येथील विद्युत केंद्रातील वाहिनीची तार तुटली तसेच इन्फ्लेक्टर फुटल्याने वाठार परिसरातील किणी, घुणकी गावांचा तीन तासांहून अधिक काळ विद्युतपुरवठा खंडित राहिला. मोठा पाऊस असूनही महावितरणचे कर्मचाऱ्यांनी विद्युतपुरवठा सुरळीत करण्यासाठी परिश्रम घेतले.