गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या धुवाँधार पावसामुळे कोल्हापूरकरांना भर उन्हाळ्यात पावसाळ्याचा अनुभव येत आहे. शहरात सर्वत्र वळवाने थैमान घातले आहे. मार्च, एप्रिल, मे या तीन महिन्यांची पावसाने सरासरी ओलांडली असून, 40 टक्के जास्त पाऊस झाला आहे.
जिल्ह्यात गुरुवारी दिवसभर पावसाची संततधार सुरू होती. कोल्हापुरात 17.4 मि.मी. पावसाची नोंद झाली. हवामान विभागाने कोल्हापूरला शुक्रवारी (दि. 23) देखील पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ दिला आहे.
शहरात गुरुवारी सकाळपासूनच पावसाने जोरदार हजेरी लावली. सकाळी सात वाजल्यापासून दहा वाजेपर्यंत मुसळधार पाऊस कोसळला. या तीन तासांच्या जोरदार सरींमुळे अनेक ठिकाणी पाणी साचले. त्यानंतर दिवसभर पावसाची रिपरिप सुरूच होती. पावसामुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले होते.
गेल्या तीन दिवसांपासून शहरात पावसाळ्याचे वातावरण आहे. रस्त्यांवर छत्र्या, टोप्या, रेनकोट घालून नागरिकांची धावपळ सुरू होती. कामावर जाणारे कर्मचारी, बाजारात खरेदीसाठी आलेले ग्राहक पावसापासून बचाव करताना दिसत होते. सखल भागांत पाणी साचल्याने वाहतूकही विस्कळीत झाली होती. काही भागांत चिखल आणि साचलेल्या पाण्यामुळे पादचार्यांची विशेष तारांबळ झाली. वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली होती.
दुपारीदेखील पावसाची रिपरिप कायम होती. सायंकाळी काही काळ पावसाने विश्रांती घेतली असली, तरी त्यानंतर पुन्हा मध्यम सरी कोसळू लागल्या. रात्री उशिरापर्यंत पावसाची रिपरिप सुरूच होती. हवामान खात्याच्या माहितीनुसार, आगामी दोन दिवस पावसाची ही स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे.
दिवसभराच्या पावसाने गुरुवारी रात्री उशिरा बालगोपाल तालीम परिसरात मोटारीवर झाड पडले. तसेच, यामुळे विद्युतवाहिन्याही तुटून पडल्या. अग्निशमन दलाचे जवान व महावितरणच्या कर्मचार्यांनी घटनास्थळी धाव घेतली.