राज्यात गेल्या काही महिन्यांपासून बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी आणि मारहाणीच्या घटनांचे व्हायरल होणारे व्हिडिओ चर्चेचा आणि गंभीर विषय बनला आहे. बीड (Beed) पोलीस प्रशासनानेही व्हायरल व्हिडिओची दखल घेत कारवाई केली आहे. मात्र, अद्यापही बीड जिल्ह्यातील अशा घटना कमी होताना दिसत नाहीत. केज तालुक्यात तरुणाचे अपहरण करत झाडाला बांधून मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली होती. मात्र, मारहाण करण्यात आलेल्या तरुणाचा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाल्याची माहिती आहे. अनैतिक संबंधाचे कारणातून ही मारहाण झाली असल्याची प्राथमिक माहिती आहे. याप्रकरणी, युसूफ वडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून 7 आरोपींना पोलिसांनी (police) ताब्यात घेतलं आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत
बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील भाटूंबा येथे अनैतिक संबंधातून अण्णा उर्फ ज्ञानेश्वर धपाटे यांचे अपहरण करत झाडाला बांधून मारहाण करण्यात आल्याची घटना उघडकीस आली होती. या मारहाणीमध्ये गंभीर जखमी झालेल्या ज्ञानेश्वर धपाटे याला अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. आता या प्रकरणात युसुफ वडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी सात आरोपींना ताब्यात घेतले आहे.
हॉटेलचालकास मारहाण, व्हिडिओ व्हायरल
बीड-अहिल्यानगर महामार्गावरील शिवमुद्रा हॉटेल चालकाला 5 ते 7 जणांच्या टोळक्याकडून बेदम मारहाण झाली आहे. मारहाणीची घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली असून अद्याप पोलीस ठाण्यातही तक्रार दाखल नाही. सीसीटीव्ही फुटेजमध्ये लाकडी दांडे आणि बेल्टने ही बेदम मारहाण होताना दिसत आहे. अविनाश साबळे, नितीन साबळे आणि अमोल लोखंडे अशी मारहाण झालेल्यांची नावे आहेत. जखमींवर सध्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मारहाण नेमक्या कोणत्या कारणाने झाली? याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. मात्र, या घटनेतून जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे.
वीजेचा शॉक लागून दोघांचा मृत्यू
बीडच्या गेवराई तालुक्यातील मारफळा येथे उसाच्या शेतामध्ये खत देण्याचे काम करत असलेल्या बाप लेकाला विद्युत तारेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. अभिमान कबले आणि ज्ञानेश्वर कबले असं पिता-पुत्राचं नाव आहे. दोघेजण आपल्या शेतात काम करत असताना त्या ठिकाणी विद्युत तार खाली पडलेली होती. त्यात प्रवाह असल्याने दोघांनाही त्याचा शॉक लागला. दोघांना बीडच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. महावितरणच्या गलथानपणाचा फटका आता या शेतकऱ्यांच्या जीवावर बेतला असून जबाबदार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी गावकऱ्यांमधून केली जात आहे.