Thursday, June 26, 2025
Homeकोल्हापूररेकॉर्डब्रेक कोसळल्यानंतर अखेर पावसाची उसंत

रेकॉर्डब्रेक कोसळल्यानंतर अखेर पावसाची उसंत

सलग दहा दिवसांच्या रेकॉर्डब्रेक कोसळधारांनंतर अखेर बुधवारी पावसाने शहरासह जिल्ह्यात उसंत घेतली आणि सूर्यदर्शन झाले. दिवसभर अधूनमधून झालेला शिडकावा वगळता पावसाची उघडीप होती

 

जिल्ह्यासह धरण क्षेत्रातील पावसाचा जोरही ओसरल्याने पंचगंगेच्या पाणी पातळीत सकाळी 7 वाजल्यापासून 10 इंचांची घट झाली. रात्री 10 वाजता पातळी 19 फूट 5 इंचांवर होती. पंचगंगेवरील 11 बंधारे अद्याप पाण्याखाली असून, एक राज्यमार्ग व तीन जिल्हामार्ग बंद झाले असून, त्यावरील वाहतूक पर्यायी मार्गाने सुरू आहे. जिल्ह्यात गेल्या दहा दिवसांत तब्बल 240.8 मि.मी. पावसाची नोंद झाली असून, गेल्या 24 तासांत शहरात 26 मि.मी., तर जिल्ह्यात सरासरी 20.4 मि.मी. पाऊस झाला. हवामान विभागाने जिल्ह्याला गुरुवारी (दि. 29) यलो अलर्ट दिला आहे.

 

शहरात शनिवार (दि. 17) पासून अधूनमधून वळवाचा जोरदार पाऊस कोसळत आहे. मंगळवार (दि. 20) पासून शहरासह जिल्ह्यात सर्वदूर धुवाँधार पाऊस कोसळला. अखेर दहा दिवसांनी पावसाने काहीशी उसंत घेतली. शहरात दिवसभर अधूनमधून पावसाचा शिडकाव सुरू होता. ग्रामीण भागात काही ठिकाणी मध्यम, तर काही ठिकाणी हलक्या सरी कोसळल्या. सूर्यदर्शन झाल्याने शहरातील मुख्य रस्ते कोरडे झाले होते. रस्त्यांवरील वर्दळ वाढली होती. दुपारनंतर अधूनमधून कोसळणार्‍या हलक्या सरींमळे शहरात नागरिक छत्री, रेनकोट घेऊन बाहेर पडले होते.

 

दहा दिवस कोसळलेल्या धुवाँधार पावसामुळे राधानगरी धरण बुधवारी 50 टक्के भरले. गेल्या 24 तासांत धरण क्षेत्रात पावसाचा जोर होता. तुळशी व कुंभी धरण क्षेत्रात अतिवृष्टी झाली. याशिवाय राधानगरी धरण क्षेत्रात 57 मि.मी. पाऊस झाला होता. मात्र, गेल्या 8 तासांत धरण क्षेत्रातीलही जोर पूर्ण कमी झाला होता.

 

शहरासह जिल्ह्यात मंगळवारी सायंकाळपासून पावसाची संततधार सुरू होती. यामुळे पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढ झाली. मंगळवारी रात्री 10 वाजता पातळी 19 फूट 9 इंचांवर होती. बुधवारी पहाटे 4 वाजता पातळी 20 फूट 1 इंचांवर गेली होती. त्यानंतर दुपारी 1 वाजेपर्यंत पातळी 20 फूट 3 इंचांवर स्थिर होती. पावसाचा जोर ओसरताच पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत दुपारी 2 वाजल्यापासून घट सुरू झाली. दुपारी 3 वाजता पाणी पातळी 20 फुटांवर आली. दुपारी 4 वाजता पाणी पातळी 19 फूट 10 इंचांवर होती. रात्री 8 वाजता पातळी 19 फूट 6 इंचांवर होती.

 

1961 नंतर पहिल्यांदाच मे महिन्यात सर्वाधिक पाऊस

 

ऐन उन्हाळ्यात गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेल्या धुवाँधार पवासाने सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. मे महिन्यात कोल्हापूर जिल्ह्यात सरासरी 51.5 मि.मी. पाऊस कोसळतो. मात्र, यंदा पावसाचा कहर पाहायला मिळाला. जिल्ह्यात मे महिन्यात आतापर्यंत 240.8 मि.मी. पावसाची नोंद झाली असून, यातील सर्वाधिक पाऊस गेल्या दहा दिवसांत कोसळला आहे. 1961 नंतर पहिल्यांदाच मे महिन्यात सर्वाधिक पाऊस झाला आहे. 1961 मध्ये मे महिन्यात 295.8 मि.मी. पाऊस झाला होता.

 

‘हे’ 11 बंधारे पाण्याखाली

 

पावसाचा जोर ओसरल्याने भोगावती नदीवरील हळदी व सरकारी कोगे या बंधार्‍यांवरील पाणी ओसरले. बुधवारी दोन बंधार्‍यांवरील पाणी ओसरले. पंचगंगा नदीवरील राजाराम, शिंगणापूर, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड, शिरोळ हे बंधारे पाण्याखाली आहेत. कासारी नदीवरील यवलूज, तर दूधगंगा नदीवरील दत्तवाड, सिद्धनेर्ली, बाचणी हे बंधारे पाण्याखाली आहेत.

 

जिल्ह्यात सरासरी 20.4 मि.मी. पाऊस

 

शहरात गेल्या 24 तासांत 26 मि.मी. पावसाची नोंद झाली, तर जिल्ह्यात गगनबावडा तालुक्यात अतिवृष्टी झाली. याशिवाय हातकणंगले तालुक्यात 24.6 मि.मी, शिरोळ 24.7, पन्हाळा 10.7, शाहूवाडी 10.9, राधानगरी 30.9, करवीर 23.4, कागल 28.4, गडहिंग्लज 10.2, भुदरगड 16.7, आजरा 10.7, चंदगड येथे 5.4 मि.मी. पाऊस झाला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -