Thursday, June 26, 2025
Homeब्रेकिंगमान्सून रखडला, आता या तारखेपर्यंत करावी लागणार प्रतीक्षा; हवामान विभागाचा अंदाज काय?

मान्सून रखडला, आता या तारखेपर्यंत करावी लागणार प्रतीक्षा; हवामान विभागाचा अंदाज काय?

विदर्भात मान्सूनचे आगमन लांबले आहे. यामुळे नागरिकांना अजून काही दिवस उष्णतेचा सामना करावा लागणार आहे. भारतीय हवामान खात्याचे (IMD) शास्त्रज्ञ प्रवीण कुमार यांनी याबद्दलची माहिती दिली आहे. विदर्भात मान्सूनपूर्व पावसासाठी 12 जूनपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. गडचिरोलीच्या काही भागांत दाखल झालेला मान्सून अनुकूल परिस्थिती नसल्यामुळे रखडला आहे, परिणामी तापमानात मोठी वाढ झाली आहे.

 

सध्या विदर्भातील काही भागांमध्ये तापमान 43 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. 12 जूनपर्यंत तापमानात वाढ कायम राहणार असून उकाडाही नागरिकांना हैराण करेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. गोंदिया जिल्ह्यातही 7 जून रोजी 38 अंश सेल्सिअस तापमान होते. मात्र त्यात वाढ होऊन आता 42.1 अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे. ज्यामुळे नागरिक उकाड्याने त्रस्त आहेत.

 

उत्तरेकडील गरम वाऱ्यामुळे तापमानात वाढ

प्रवीण कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, 12 जूननंतर विदर्भात पावसाचे एक वातावरण तयार होत आहे. त्यामुळे त्या दिवशी पावसाचा अंदाज आहे. हा पाऊस साधारण असला तरी, वादळी वाऱ्यांचा जोर मोठ्या प्रमाणात असणार आहे. विदर्भात मान्सूनची साधारण तारीख 10 ते 15 जून असते. यंदा मान्सून लवकर दाखल झाला असला तरी, त्यानंतर अनुकूल परिस्थिती निर्माण न झाल्याने तो रखडला आहे. बंगालच्या खाडीतून किंवा अरबी समुद्रातून पावसाला पूरक वातावरण निर्माण होत नसल्याने उत्तरेकडून गरम वारे येत आहेत. ज्यामुळे तापमानात वाढ झाली आहे.

 

यामुळे 12 जूनदरम्यान निर्माण होणारे वातावरण किती मजबूत असेल, यावर पुढील परिस्थिती अवलंबून आहे. त्यानंतर 17 जूनच्या आसपासही एक परिस्थिती निर्माण होत आहे, परंतु ती किती अनुकूल राहते हे पाहावे लागेल. केरळमध्ये मान्सून लवकर दाखल होऊन काही दिवस पाऊस पडला असला तरी, आता तो रखडल्याने शेतकऱ्यांनी पेरणीसाठी घाई करू नये. चांगल्या पावसाची वाट पाहावी. तसेच हवामान विभाग वेळोवेळी देईल त्या माहितीवर लक्ष ठेवावे, असा सल्ला नागपूर हवामान विभागाने दिला आहे.

 

जळगावात पाणी टंचाई

जून महिना उजाडला असला तरी, जळगाव जिल्ह्यातील 18 गावांमध्ये अजूनही पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. मृग नक्षत्र सुरू होऊनही पावसाचे आगमन न झाल्याने अनेक गावांमध्ये पाण्याची समस्या कायम आहे. जळगाव जिल्ह्यात सद्यस्थितीत 18 गावांना 22 टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे, तर काही गावांमध्ये विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. चाळीसगाव, भडगाव, पारोळा, भुसावळ, जामनेर, अमळनेर आणि पाचोरा या 7 तालुक्यांमध्ये एकूण 18 गावांना 22 टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. यापैकी चाळीसगाव तालुक्यात सर्वाधिक 7 गावांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.

 

जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, जून महिन्यात एका टँकरची वाढ झाली आहे. जिल्ह्यातील 15 तालुक्यांपैकी 8 तालुके टँकरमुक्त आहेत, म्हणजेच तेथे पाणीटंचाईची समस्या नाही. दरवर्षी मे महिन्यात टँकरची संख्या उच्चांक गाठते, परंतु यावर्षी मान्सूनपूर्व पावसामुळे मे महिन्यात टँकरसाठी मागणीचे प्रस्ताव आलेच नाहीत, ही एक दिलासादायक बाब होती. मात्र, आता मान्सून लांबल्याने ग्रामीण भागात पाणीटंचाईचे सावट कायम आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -