Wednesday, June 25, 2025
Homeकोल्हापूरKolhapur: बाबा, एकदा तरी माझ्याशी बोला ना..!, चिमुकलीची आर्त हाक, रंगकाम करताना...

Kolhapur: बाबा, एकदा तरी माझ्याशी बोला ना..!, चिमुकलीची आर्त हाक, रंगकाम करताना विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू

माणूस मरतो म्हणजे नेमके काय होते ते कळायच्या आधीच चिमुकलीच्या वडिलांना नियतीने हिरावून घेतले. बाबा.. बाबा.. म्हणत ती अश्रू ढाळत सीपीआरच्या अपघात विभागाबाहेरील गर्दीत वडिलांना शोधत होती.

 

अखेर निपचित पडलेल्या बाबांना तिने पाहिले. बाबा, एकदा तरी माझ्याशी बोला ना.. अशी आर्त हाक तिने मारताच उपस्थितांच्या काळजाचा ठोका चुकला अन् अनेकांना अश्रू अनावर झाले. ही घटना रविवारी (दि. २२) दुपारी सीपीआरमध्ये घडली.

 

नवे पारगाव येथील होतकरू तरुण सागर शिंदे हा पत्नी बिना, मुलगा अंश (१०) आणि मुलगी श्रीशा (७) हिच्यासह नवे पारगाव येथे राहत होता. मेहुणा राजकुमार बनसोडे याच्यासोबत तो इमारती रंगविण्याचे काम घेत होता. रविवारी सकाळी घुणकी येथील एका घराचे रंगकाम करण्यासाठी दोघे गेले होते. राजकुमार खालच्या मजल्यावर रंगकाम करीत होता, तर सागर वरच्या मजल्यावरील लोखंडी रेलिंग रंगविण्यासाठी गेला होता.

 

लोखंडी पाइपला रोलर लावून रंगकाम करताना त्याची पाइपजवळच असलेल्या विजेच्या तारेला चिकटली. काही वेळ तो तिथेच चिकटून राहिला. शेजाऱ्यांना हा प्रकार लक्षात येताच विजेचा प्रवाह बंद करून त्याला खाली आणले. १०८ रुग्णवाहिकेतून त्याला सीपीआरमध्ये दाखल केलेे. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

 

मेहुणा राजकुमार यांनी याची माहिती घरी कळवताच सागरची पत्नी, तिची आई आणि सात वर्षांची चिमुकली श्रीशा सीपीआरमध्ये पोहोचले. पतीचा मृत्यू झाल्याचे समजताच बिना यांचे हातपाय गळाले. आईने हंबरडा फोडला. चिमुलकी श्रीशाची नजर तिच्या वडिलांना शोधत होती. आई आणि आजीला रडताना पाहून तिच्याही डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहत होत्या. बाबा..बाबा असे म्हणत ती बाबाला शोधत होती. मध्येच मामाकडे जाऊन मला बाबा दाखव, असा आग्रह करीत होती.

 

बाबाला भेटण्याची चिमुकलीची धडपड आणि कुटुंबाची हतबलता पाहून उपस्थितांनाही गहिवरून आले. अखेर बाबाला पाहताच एकदा तरी माझ्याशी बोल ना..अशी आर्त हाक तिने घालताच अनेकांनी बराच वेळ थांबवून ठेवलेला अश्रूंचा बांध फुटलाच. असे दु:ख कोणाच्याही वाट्याला येऊ नये अशीच भावना सगळ्यांच्या डोळ्यात दिसत होती.

 

कष्टाने फुलवलेला संसार करपला

 

सागरच्या वडिलांनी २५ वर्षांपूर्वी आईचा खून केला होता. आईचे छत्र हरवले आणि वडील तुरुंगात गेल्यानंतर चुलत्यांच्या पाठबळावर सागर जिद्दीने संसार फुलवत होता. शिक्षा भोगून सुटलेल्या वडिलांचे चार वर्षांपूर्वी निधन झाले. आता सगळे काही सुरळीत होत असताना अचानक नियतीने सागरवर घाला घातल्याने नवे पारगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -