अहमदाबाद मधील विमान अपघातानंतर एअर इंडियाची सर्वच स्तरातून नाच्चकी होत आहे. त्यातच भर म्हणजे विमान अपघातानंतरही एअर इंडियाच्या मागची संकटाची मालिका काही केल्या संपेना… मागील आठवड्यात एअर इंडियाच्या विमानात अनेकदा तांत्रिक बिघाड आढळून आला, अनेक विमानांची उड्डाणे अचानकपणे रद्द करावी लागली. आता या एकूण सर्व पार्श्वभूमीवर प्रवाशांचा एअर इंडिया वरील विश्वास उडाल्याचे चित्र दिसत आहे. कारण एअर इंडियाच्या फ्लाईट बुकिंग मध्ये तब्बल २० टक्क्यांनी घसरण (Air India Booking Down) झाली आहे. इंडियन असोसिएशन ऑफ टूर ऑपरेटर्स (आयएटीओ) चे अध्यक्ष रवी गोसाई यांनी ही माहिती दिली आहे. एअर इंडिया साठी ही मोठी चिंतेची बाब आहे.
तिकीट रद्द करण्याच्या प्रमाणात वाढ- Air India Booking Down
रवी गोसाईं म्हणाले की, फ्लाईट बुकिंगमधील ही घसरण जास्त वेळ राहणार नाही. एअर इंडियाच्या (Air India Booking Down) फ्लाईटच्या बुकिंगची संख्या पुन्हा रुळावर येऊ शकते. की गेल्या आठवड्यात आंतरराष्ट्रीय स्तरावर तिकीट रद्द करण्याच्या प्रमाणात १५-१८ टक्के वाढ झाली आहे तर देशांतर्गत विमान प्रवास करत असताना १० टक्के प्रवाशांनी एअर इंडियाची तिकिटे रद्द केली आहे हे खरं असलं तरी येत्या काही दिवसांत परिस्थिती पूर्वपदावर येईल. कारण एअर इंडियाच्या सिस्टीम मध्ये सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही समस्या आढळून आलेली नाही, आणि विमान कंपनी या आंतरराष्ट्रीय सुरक्षा मानकांचे पालन करत असल्याची पुष्टी स्वतः डीजीसीए सारख्या अधिकाऱ्यांनी दिली असल्याचं रवी गोसाई यांनी सांगितले.
विमान प्रवास झाला स्वस्त –
या प्रतिकूल परिस्थितीत एअर इंडियाने चार पाऊले मागे जात विमान प्रवास स्वस्त करण्याचा निर्णय घेतला आहे. आधीच लोकांचा एअर इंडिया वरील विश्वास कमी होऊ लागलाय, विशेषतः कॉर्पोरेट आणि उच्च श्रेणीतील प्रवाशांनी वाहतुकीचे इतर पर्याय शोधण्यास सुरुवात केलीय. अशावेळी प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी एअर इंडियाने (Air India) आंतरराष्ट्रीय मार्गावरील विमान प्रवासाच्या किमती सरासरी ८ ते १२ टक्क्यांनी कमी केल्या आहेत. विशेषतः युरोप आणि आग्नेय आशियातील प्रवासासाठी एअर इंडियाने तिकीट दर स्वस्त केलेत.
दरम्यान, एअर इंडियाने त्यांच्या वाइडबॉडी विमानांवरील आंतरराष्ट्रीय सेवा १५% ने कमी करण्याचा निर्णय घेतला. प्रवाशांना चांगली कार्यक्षमता देण्यासाठी आणि आणि प्रवाशांची गैरसोय कमी करण्यासाठी एअर इंडियाने हे पाऊल उचललं आहे. येत्या २० जून पासून हि उड्डाणात हि कपात होणार असून किमान जुलैच्या मध्यापर्यंत सुरू राहील. या काळात, कोणत्याही अनपेक्षित व्यत्ययाला तोंड देण्यासाठी एअर इंडियाकडे राखीव विमाने उपलब्ध असतील. परदेशी उड्डाणे तात्पुरती बंद केल्याने प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल एअरलाइनने माफी मागितली आहे.