भरधाव डंपरने समोरून येणाऱ्या दुचाकीला धडक दिल्याने घडलेल्या अपघातात तिघे जागीच ठार झाले. मंगळवारी (ता. २४) सकाळी ९.४५ च्या सुमारास मुस्ती – धोत्री (ता. दक्षिण सोलापूर) रस्त्यावर हा अपघात घडला.
तिघेही मुस्ती येथील असून बांधकाम कामगार म्हणून काम करत होते. या अपघातात तिघांचा मृत्यू झाल्याने मुस्ती गावावर शोककळा पसरली.
देविदास मारुती दुपारगुडे (वय ३५), नितीन श्याम वाघमारे (वय ३२, दोघेही रा. मुस्ती, ता. दक्षिण सोलापूर) व हणमंत गोपीनाथ पवार (वय ४३, रा. हरणाट तांडा, मुस्ती) अशी मृतांची नावे आहेत. तिघेही दुचाकीवर (क्र. एम एच २३ डी जे ५४६६ ) हणमगावकडे निघाले होते. मुस्तीपासून चार किलोमीटर अंतरावर तलावाजवळ समोरून आलेल्या डंपरने (क्र. एच एच १२ टीव्ही २७७९) दुचाकीला ठोकरल्याने हा अपघात घडला.
तिघांवर सायंकाळी अंत्यसंस्कार
सोलापुरातील शासकीय रुग्णालयात तिघांचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर सायंकाळच्या सुमारास तिघांचेही मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले. रात्री आठच्या सुमारास तिघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
तिघेही उडून पडले रस्त्याकडेला
भरधाव डंपरने इतक्या जोरात धडक दिली की, अपघातानंतर तिघेही उडून रस्त्याकडेला खड्ड्यात वेगवेगळ्या ठिकाणी पडले होते. यावरून डंपरने दिलेल्या धडकेची तीव्रता लक्षात येते. अपघातानंतर चालकाने डंपरसह पलायन केले. त्या रस्त्याने निघालेल्या एका शेतकऱ्याचा मुलगा बांधकाम कामगार आहे. त्यामुळे ते या तिघांनाही ओळखत होते. त्यांनी तातडीने मुस्ती ग्रामस्थांना कळवले. त्यानंतर ग्रामस्थांसह वळसंग पोलिसांनी घटनास्थळी पोचून तिघांना उपचारासाठी सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, तिघांचा मृत्यू झाला होता. याप्रसंगी नातेवाइकांसह ग्रामस्थांनी शासकीय रुग्णालयात गर्दी केली होती.
तासाभरात डंपरपर्यंत पोचले पोलिस
अपघातानंतर चालकाने डंपरसह पलायन केल्याने कोणत्या वाहनाने धडक दिली, याबाबत माहिती नव्हती. मात्र, त्या भागातील खडी मशिन, वीटभट्टीमुळे डंपरचा वावर आहे. त्यामुळे त्याची वाहतूक करणाऱ्या वाहनांनी धडक दिली असावी, अशी शंका ग्रामस्थांना होती. अपघाताची माहिती मिळताच फौजदार सागर पाटील, हेडकॉन्स्टेबल रामदास मालचे हे घटनास्थळी पोचले. त्यांनी तातडीने दर्गनहळ्ळी, धोत्री, वळसंग, तांदूळवाडी येथे चौकशी केली. एक डंपर भरधाव गेल्याची माहिती एकाने पोलिसांना दिली. तसेच त्यावर एका महापुरुषाचे छायाचित्र असल्याचेही सांगितले. चालकाने मालकाच्या शेतात डंपर लावून पलायन केले होते. पोलिसांनी संपर्क करून अपघाताची माहिती दिल्यानंतर मालकाने डंपर पोलिस ठाण्यात आणून लावला. तपासणीत दुचाकीला धडक दिल्यामुळे डंपरच्या इंडिकेटरचे फायबर तुटल्याचे आढळल्याचे पोलिसांनी सांगितले.
तिघेही कष्टकरी, कुटुंबांचा हिरावला आधार
तिघेही रोज बांधकामावर काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचे. नेहमीप्रमाणे कामावर जाताना झालेल्या अपघातात मृत्यू झाल्याने तिघांचीही मुले पोरकी झाली. देविदास यांच्यामागे आई, वडील, पत्नी, तीन मुले, नितीन यांच्यामागे आई, वडील, एक मुलगा, एक मुलगी तर हणमंत यांच्यामागे पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. तिघांचीही मुले लहान आहेत. त्यांच्या कष्टावरच कुटुंबे अवलंबून होती. कमावत्या माणसांवरच काळाने घाला घातल्याने त्यांचा आधार हिरावला गेला.
लहान मुले पोरकी, आधाराची तुटली काठी
द. सोलापूर ः मुस्ती (ता. दक्षिण सोलापूर) येथून दुचाकीवर हणमगावला कामावर निघालेल्या युवा बांधकाम कामगारांचा डंपरच्या धडकेत मृत्यू झाला. या अपघातात कुटुंबातील कर्त्या, कमावत्यांचाच मृत्यू झाल्याने मुस्तीतील तीन कुटुंबांनी आधार गमावला आहे. तिन्ही कुटुंबांतील लहान मुले पोरकी झाली तर ज्येष्ठांच्या आधाराची काठी तुटली आहे.
देविदास मारुती दुपारगुडे, नितीन श्याम वाघमारे व हणमंत पवार (रा. मुस्ती) हे तिघे त्यांच्या त्यांच्या कुटुंबांचा आधार होते. कुटुंबात ते तिघेही कमावते होते. बांधकामावर काम करून कुटुंबाचा सर्व भार पेलत होते. तिघांनाही दोन ते सहा वर्षांची लहान मुले आहेत. देविदास व नितीन आपल्या आई – वडिलांसह मुस्तीत राहात होते तर हनुमंत पवार सासुरवाडीत राहात होता. २५ किलोमीटर अंतरावरील हणमगावला ते तिघेही एकाच दुचाकीवर निघाले होते. तेथे जाण्यासाठी अन्य सुविधा नसल्याने त्यांना रोज एकाच दुचाकीवरून ये – जा करावी लागत होती. तिघांनी लहान वयातच कुटुंबाची जबाबदारी अंगावर घेतली होती. ते दररोज कष्ट करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. कष्टाळू असल्याने रोज कामावर जात होते, असे ग्रामस्थांनी सांगितले.
बससेवा बंद; जड वाहतुकीमुळे अपघात
यापूर्वी या मार्गावर हंजगी – तुळजापूर अशी बससेवा होती. त्यामुळे एक चांगला पर्याय होता. पण काही वर्षांपासून ही बससेवा बंद झाल्याने बरेच लोक अशा प्रकारे दुचाकीवरून प्रवास करतात. या मार्गावर सकाळ व संध्याकाळ बससेवा सुरू होणे अपेक्षित आहे. याशिवाय या मार्गावरून खडी वाहतुकीचे डंपर, सिमेंटचे बल्कर जात असल्याने सतत अपघात घडतात. तांदूळवाडी ते तिलाटी गेट रस्त्यावरील डंपर व बल्करची वाहतूक निदान दिवसा बंद करावी, असे अप्पासाहेब बिराजदार यांनी म्हटले.