ओडिशामधील पुरी येथील प्रसिद्ध जगन्नाथ यात्रेत मोठी गर्दी झाली असून यामध्ये चेंगराचेंगरी झाल्याचं वृत्त आहे. या चेंगराचेंगरीत ५०० जण जखमी झाले असून ८ जणांची प्रकृती गंभीर असल्याचं एनडीटीव्हीनं दिलेल्या वृत्तात म्हटलं
रथ यात्रा थांबवली – सुदर्शन पटनायक
या यात्रेत रथ ओढताना प्रचंड गर्दीमुळं काही भाविकांना गुदमरल्याचा त्रास झाला. यामध्ये तीन-चार लोक बेशुद्ध झाले. त्यानंतर त्यांना तातडीनं अॅम्ब्युलन्समधून रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेवर बोलताना प्रसिद्ध वाळू शिल्पकलाकार सुदर्शन पटनायक यांनी सांगितलं की, महाप्रभू जगन्नाथ रथ यात्रेला आजच सुरुवात झाली आणि आजच रथ रोखण्याची नामुष्की ओढवली. उद्या पुन्हा हे रथ मावशीच्या घरापर्यंत ओढले जाणार आहेत. काही लोकांना आश्चर्य वाटलं की रथ का रोखण्यात आले.
दमट हवेमुळं भाविकांना झाला त्रास – ओडिशा मंत्री
यात्रेदरम्यान काही लोक बेशुद्ध पडल्याचं ओडिशाचे मंत्री मुकेश महालिंग यांनी सांगितलं. दमट हवेमुळं त्यांना गुदमरलं आणि त्यामुळं ते बेशुद्ध झाले असं मंत्री मुकेश यांनी सांगितलं. यानंतर त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मंदिराच्या परिसरात प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. लोकांना पुरेशा प्रमाणात ग्लुकोज आणि पाणी उपलब्ध होईल याची काळजी घेण्यासाठी मी इथं उपस्थित आहे.