कोकण आणि गणपती हे एक अनोखं नातं आहे. दरवर्षी लाखो चाकरमानी गणेशोत्सवात कोकणात जातात. यंदाही मुंबई, पुण्यासह ठिकठिकाणचे अनेक कोकणी कुटुंब हे गावाकडे जाण्यासाठी निघाले आहेत. येत्या २७ ऑगस्ट २०२५ रोजी घरोघरी लाडक्या बाप्पाचे आगमन होत आहे. त्यामुळे कोकणातील चाकरमान्यांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या लाखो चाकरमान्यांसाठी सरकारने खास सुविधा केली आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी ५,००० जादा बसेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.
एसटी आणि रेल्वेची सोय काय?
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची मुंबई, ठाणे आणि आसपासच्या शहरांमध्ये मोठी गर्दी झाली आहे. विविध रेल्वे स्थानके आणि एसटी डेपोवर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. ज्यामुळे वाहतूक व्यवस्थेवर मोठा ताण दिसून येत आहे. गणेशोत्सवासाठी एसटी महामंडळाने कंबर कसली आहे. कोकणवासीयांना गावी पोहोचवण्यासाठी ५,१०३ अतिरिक्त बस फेऱ्यांचे नियोजन केले आहे. मुंबईतून तीन डेपोमधून ९७३ गाड्या कोकणासाठी रवाना होणार आहेत. यामध्ये कुर्ला डेपोतून ६९ गाड्या सोडण्यात येत आहेत. मुंबई, पनवेल, पालघर, रायगड येथून एकूण १,८०७ गाड्या सोडल्या जाणार आहेत.
गेल्या वर्षीपेक्षा यंदा एसटीचे बुकिंग वाढले आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी गाड्यांची देखभाल करून त्या चालकांच्या ताब्यात देण्यात आल्या आहेत. रविवार असल्याने कुर्ला डेपोतून ७१ गाड्या सोडण्यात येणार आहेत. तर दुसरीकडे ठाणे रेल्वे स्थानकात कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गर्दी उसळली आहे. मांडवी एक्सप्रेस पकडण्यासाठी प्रवाशांनी २४ तास आधीच लांबच लांब रांगा लावल्या आहेत. मांडवी एक्सप्रेस उशिराने धावत आहे. त्यामुळे गणेशभक्तांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी रेल्वे सुरक्षा दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.