कुंभोज-माळवाडी रस्त्यावरील चौगुलेवाडी येथे शेतकरी गुणधर पाचोरे यांच्या शेतात अघोरी प्रकार केल्याची धक्कादायक घटना रविवारी उघडकीस आली आहे. शनिवारी अमावस्येच्या रात्री त्यांच्या गट क्रमांक 2397 मधील शेताच्या मध्यभागी नारळ, काळी बाहुली, लिंबू आणि त्याला सुया टोचून ठेवल्याचे आढळून आले.
या घटनेमुळे ग्रामस्थांत भीतीचे वातावरण पसरले आहे.
कुंभोज आणि परिसरात अघोरी पूजा, करणी, भानामती यांसारख्या प्रकारांतून काही भोंदूबाबा लोकांमध्ये गैरसमज निर्माण करत आहेत. काहीवेळा चितेतील राखेचा वापर करून तंत्रमंत्र केले जातात. अमावस्या, पौर्णिमा आणि शनिवारी रात्रीच्या वेळी गावाबाहेरील तसेच गावातील काही व्यक्तींकडून असे प्रकार केले जात असल्याचे ग्रामस्थ सांगतात. गावातील प्रमुख रस्ते आणि तिठ्यांवरही अनेकदा असे साहित्य आढळून येते.
अघोरी प्रकार करणार्यांवर कारवाईची मागणी
बुधवारी, शनिवारी, अमावास्या आणि पौर्णिमेच्या मध्यरात्री बाहेरगावच्या काही लोकांकडून व गावातील काही अशा मनोवृत्तीच्या लोकांकडून असे अघोरी प्रकार केले जातात. गावातील प्रमुख रस्ते आणि जिथे तीन रस्ते एकत्र येतात अशा ठिकाणी असे साहित्य ठेवलेले दिसत आहेत. असे प्रकार करणारे व करायला लावणार्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे.