राज्यात पावसामुळे मोठं नुकसान झालं आहे, पावसाचा चांगलाच तडाखा शेतकऱ्यांना बसला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात मुसळधार पाऊस सुरूच आहे. दरम्यान आता आणखी एक चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे महाराष्ट्रातील मान्सूनच्या परतीचा प्रवास लांबला आहे. साधारणपणे एक ऑक्टोबरच्या आसपास मान्सून महाराष्ट्रातून माघार घेतो, मात्र यंदा पाच ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रात मान्सूनचा मुक्काम असणार आहे. भारतीय हवामान विभागानं (IMD) दिलेल्या माहितीनुसार यंदा मान्सून 5 ऑक्टोबर पूर्वी राज्यातून परतणार नाहीये.
बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं आहे, त्यामुळे पुढील काही दिवस राज्यात पावसाचा जोर आणखी वाढणार असल्याचा इशारा हावामान खात्याकडून देण्यात आला आहे. हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील तीन ते चार दिवस महाराष्ट्र मुसळधार पावसाची शक्यता आहे. येत्या पाच ऑक्टोबरपर्यंत राज्यात पावसाचा जोर कायम राहणार आहे.
हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार उद्या महाराष्ट्रात पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे, तर दुसरीकडे कोकण आणि मध्य महाराष्ट्रात देखील पावसाचा हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढील तीन ते चार दिवस मच्छिमारांनी समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये असं आवाहनही हवामान खात्याकडून करण्यात आलं आहे.
पावसामुळे राज्यात प्रचंड नुकासन
महाराष्ट्राला यंदा पावसानं झोडपून काढलं आहे, पावसाचा सर्वाधिक फटका हा मराठवाड्याला बसला आहे. मराठवाड्यामध्ये पावसामुळे प्रचंड नुकसान झालं आहे. अनेक गावांना पुराचा वेढा पडला असून, सपंर्क तुटला आहे. अनेकांच्या घरात पाणी शिरल्यानं संसारोपयोगी साहित्य पाण्यासोबत वाहून गेल्यानं नागरिक हातबल झाले आहेत. पावसामुळे शेतीमधील पिकांचं देखील मोठं नुकसान झालं असून, आता शेतकरी शासनाकडून मिळणाऱ्या मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र अजूनही पावसाचं संकट कमी झालं नसून, पुन्हा पावसाचा इशारा देण्यात आल्यानं काळजी वाढली आहे. मराठवाड्यात उद्या जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.




