अंडर 19 टीम इंडियाने 2026 या वर्षात अविस्मरणीय आणि ऐतिहासिक अशी सुरुवात केली आहे. टीम इंडियाने वैभव सूर्यवंशी (Vaibhav Suryavanshi) याच्या नेतृत्वात यजमान दक्षिण आफ्रिकेचा तिसऱ्या आणि अंतिम एकदिवसीय सामन्यात धुव्वा उडवला आहे. वैभव सूर्यवंशी आणि अॅरॉन जॉर्ज या सलामी जोडीने केलेल्या शतकाच्या जोरावर भारताने दक्षिण आफ्रिकेसमोर 394 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र भारतीय गोलंदाजांसमोर दक्षिण आफ्रिकेने गुडघे टेकले. भारतीय गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेला 35 ओव्हरमध्ये 160 रन्सवर गुंडाळलं. भारताने अशाप्रकारे या मालिकेतील एकूण आणि सलग तिसरा सामना जिंकला.भारताने यासह दक्षिण आफ्रिकेला 3-0 ने क्लिन स्वीप केलं.
दक्षिण आफ्रिकेची घसरगुंडी
भारतीय गोलंदाजांनी 394 धावांचा पाठलाग करायला आलेल्या दक्षिण आफ्रिकेला झटपट 4 झटके देत बॅकफुटवर ढकललं आणि सामन्यावर घट्ट पकड मिळवली. दक्षिण आफ्रिकेच्या पहिल्या 4 पैकी 3 फलंदाजांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. तर 1 फलंदाज आला तसाच बाद होऊन मैदानाबाहेर गेला. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेची 4 आऊट 15 अशी बिकट स्थिती झाली. त्यानंतर मिडल आणि लोअर ऑर्डरमधील फलंदांजांनी छोटेखानी भागीदारी केली. मात्र भारतीय गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेला ठराविक अंतराने झटके देणं सुरु ठेवलं होतं. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेच्या एकाही फलंदाजाला काही करता आलं नाही.



