अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डीमध्ये 200 एकर जागेवर भव्य असा क्षेपणास्त्र संकुल आणि तोफगोळा उत्पादन प्रकल्प उभारण्यात आला आहे, या प्रकल्पाचे शनिवारी लोकार्पण करण्यात आले, यावेळी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांची उपस्थिती होती.
दरम्यान यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं निबे गृपच्या वतीनं हा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. अर्ध्या किलोमिटरचे ९ मोठे शेड आहेत, ज्यामध्ये जगातील आधुनीक यंत्रसामग्री लागलेली आहे. भारतासाठी इथे शस्त्रनिर्मिती होणार आहे. 150 ते 300 किमी मारा करणाऱ्या मिसाईल तयार होणार आहेत. निबे कंपनीने 1000 किमीपर्यंत जाऊ शकतील असे ड्रोन तयार केले आहेत. दारुगोळा देखील मोठ्या प्रमाणात तयार होणार आहे. आज या प्रकल्पाचं लोकार्पण देशाचे संरक्षमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते झालं. पुढेच्या पाच वर्षांच्या या कंपनीच्या एक्स्पोर्ट ऑर्डर बूक आहेत. स्वत: संरक्षण मंत्र्यांनी या प्रकल्पाचं उद्घाटन केलं आहे. साईंच्या भूमित शक्तीची उपासना सुरु झाली आहे, अशी प्रतिक्रिया यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
दरम्यान यावेळी बोलताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं की, संरक्षण क्षेत्रात भारत जो कधीकाळी मोठा आयातदार होता, तो आता मोठा निर्यातदार बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. महाराष्ट्र विकासाच्या नव्या उंचीवर पोहोचत आहे. रक्षा क्षेत्रासाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. स्वातंत्र्यानंतर अनेक वर्षे संरक्षण क्षेत्रात आवश्यक तेवढा समन्वय नव्हता. परंतु आता ‘आत्मनिर्भर भारत’ आणि ‘मेक इन इंडिया’च्या माध्यमातून आपण मोठं काम करत आहोत. खासगी क्षेत्राच्या मदतीने आपण पुढे जात आहोत. जो देश स्वतःची शस्त्रं तयार करतो, तो देश स्वतःचं भविष्यही घडवतो. खासगी क्षेत्राची मदत आज अत्यंत महत्त्वाची आहे. खासगी क्षेत्र जोखीमही घेतं आणि कामही करतं, असं यावेळी राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे.


