यंदा मान्सूच्या आगमनाला विलंब झाला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. कारण जेवढा मान्सूनच्या आगमनाला विलंब होईल तेवढाच विलंब पुढे खरीप हंगामातील पेरण्याला देखील होतो. मात्र आता शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. ती म्हणजे पुढील काही तासांमध्ये मान्सून केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. दरम्यान मान्सून एकदा केरळमध्ये दाखल झाला की त्यानंतर त्याची वाटचाल महाराष्ट्राच्या दिशेनं सुरू होईल. सध्या महाराष्ट्रील अनेक भागांमध्ये मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावल्यामुळे नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळाला आहे. मात्र आता सर्वांचं लक्ष लागलं आहे, ते म्हणजे मान्सूनच्या आगमनाकडे.
याचदरम्यान हवामान विभागाकडून अत्यंत मोठा आणि धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईकरांसाठी हे दिवस अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत. या महिन्यात तब्बल ६ वेळा मुंबईत समुद्राला उधाण येणार आहे. प्रचंड उंचीच्या लाटा समुद्रात उसळणार आहेत. त्यामुळे या काळात नागरिकांनी समुद्राकाठी जाणं टाळावं, सतर्क रहावं असं आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आलं आहे.
१. रविवार, दि. १४.०६.२०२६ सकाळी – ११.२४ वा. लाटांची उंची (मीटर्स) – ४.६५ २. सोमवार, दि. १५.०६.२०२६ दुपारी – १२.१४ वा. लाटांची उंची (मीटर्स) – ४.८० ३. मंगळवार, दि. १६.०६.२०२६ दुपारी – ०१.०५ वा. लाटांची उंची (मीटर्स) – ४.८७ ४. बुधवार, दि. १७.०६.२०२६ दुपारी – ०१.५५ वा. लाटांची उंची (मीटर्स) – ४.८६ ५. गुरुवार, दि. १८.०६.२०२६ दुपारी – ०२.४४ वा. लाटांची उंची (मीटर्स) – ४.७९ ६. शुक्रवार, दि. १९.०६.२०२६ दुपारी – ०३.३२ वा. लाटांची उंची (मीटर्स) – ४.६४
यंदा मान्सूनवर अल निनोचं सावट
दरम्यान भारतीय हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार यंदाच्या पावसावर अल निनोच सावट असणार आहे. त्यामुळे यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यात आहे. शेतकऱ्यांनी पेरण्याची घाई करू नये, असा इशारा देखील या पार्श्वभूमीवर हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. अल निनोमुळे पावसाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.






