राज्यात सध्या सर्वदूर पाणी बरसते आहे. त्यामुळे राज्यभरातील शेतकरी पेरणीच्या कामात व्यग्र आहेत. काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडलेला आहे. तर काही ठिकाणी अजूनही शेतकऱ्यांना चांगल्या पावसाची प्रतीक्षा आहे. जूनच्या शेवटच्या आठवड्यात आलेला हा पाऊस आता जुलै महिन्यात कसा असेल, असा सगळ्यांनाच प्रश्न पडला आहे. याच पार्श्वभूमीवर हवामान आणि पावसाची माहिती देणारे पंजाबराव डख यांनी जुलैच्या पहिल्या आठवड्यात पाऊस कसा असेल, याबाबत सविस्तर माहिती दिली आहे.
पावसाचा अंदाज काय?
पंजाबाराव डख यांनी सांगितल्याप्रमाणे पुणे, मुंबई आणि उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक सूचना आहे. 2 जुलै ते 8 जुलै या काळात मुंबईत अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. आतापर्यंत कधीच न झालेला पाऊस या काळात पडू शकतो, असं भाकित त्यांनी वर्तवलं आहे. तसेच मुंबई, पुणे, उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी या आठ दिवसात काळजी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
2 जुलै ते 8 जुलैच्या काळात चक्रीवादळ
पश्चिम महाराष्ट्रातही या काळात चांगला पाऊस पडेल. मुंबई, इगतपुरी, नाशिक, त्र्यंबकेश्वर, अहिल्यानगर या भागातही काही ठिकाणी अतिवृष्टी होईल. काही ठिकाणी रिमझीम पाऊस पडेल. 2 जुलै ते 8 जुलैच्या काळात कमी दाबाच्या पट्ट्याचे रुपांतर हे चक्री वादळात होईल. ते चक्रीवादळ महाराष्ट्राकडे येणार आहे. म्हणूनच जुलैच्या पहिल्या आठवड्यात हा पाऊस होणार आहे, असा अंदाज त्यांनी व्यक्त केलाय.
धरणं भरायला सुरुवात होणार
या पावसामुळे निळवंडे धरणात पाणी येणार. मुळा धरणातही पाण्याची आवक सुरू होईल. त्र्यंबकेश्वरमध्ये पाऊस पडल्यामुळे गंगापूरचे धरण भरेल. प्रवरा नदीवरील धरणांतही पाण्याची आवक होईल. नाशिकमधील छोटी धरणंही भरतील. 8 जुलैपर्यंतचा पाऊस ही धरणं भरण्यासाठी महत्त्वाचा असेल, असंही त्यांनी पुढे सांगितलं आहे.
जुलै महिन्यात चांगला पाऊस होईल
कोल्हापूर, सांगली जिल्हा, साताऱ्यातील पूर्वेकडचा भाग आटपाडी, कासेगाव या भागातही पाऊस पडणार आहे. सोलापूर जिल्ह्यातही पाऊस चांगला होईल, अंदाज त्यांनी वर्तवला आहे. तसेच जुलै महिन्यात चांगला पाऊस होईल. ऑगस्ट महिन्यात दोन पाऊस मोठे होतील. नंतर परतीचा पाऊस राज्यात धुमाकूळ घालेल, असेही त्यांनी सांगितले आहे.




