राज्यसरकारकडून शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्वाची आणि मोठी घोषणा करण्यात आली आहे. ही बातमी शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीचीचा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्यातील शेतकरी कर्जमाफीबाबत भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी महत्त्वाची माहिती देत राज्य सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. सरकारकडून सुमारे 56 लाख शेतकऱ्यांना 36 हजार कोटी रुपयांची कर्जमाफी दिली जाणार असून, कोणताही पात्र शेतकरी या योजनेपासून वंचित राहणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
माध्यमांशी बोलताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, कर्जमाफीच्या प्रक्रियेत कोणत्याही प्रकारच्या त्रुटी राहू नयेत, यासाठी सरकार विशेष काळजी घेत आहे. पात्र असलेला एकही शेतकरी नियमांच्या अडचणीमुळे योजनेतून वगळला जाणार नाही, असा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
यासंदर्भात कृषी मंत्र्यांनीही स्पष्ट भूमिका मांडली असून, “कोणताही पात्र शेतकरी केवळ तांत्रिक किंवा नियमांच्या कारणामुळे कर्जमाफीपासून वंचित राहणार नाही,” असे त्यांनी सांगितल्याचे मुनगंटीवार यांनी नमूद केले.
यावेळी त्यांनी ही कर्जमाफी योजना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने राबविण्यात येत असल्याची माहितीही दिली. शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या उद्देशाने सरकारने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, राज्य सरकारच्या या घोषणेमुळे लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात असून, कर्जमाफीच्या अंमलबजावणीकडे आता राज्यभरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

