ताजी बातमी ऑनलाइन टीम
महाराष्ट्र विकास आघाडी सरकारनं राज्य सराकरी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ केली आहे. केंद्राप्रमाणेच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनाही महागाई भत्ता वाढवून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रानं तीन टक्के महागाई भत्त्यात वाढ करण्याता निर्णय आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला होता.
त्यानंतर आता राज्य सरकारनंही राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये वाढ करण्याची घोषणा केली आहे. वाढीव महागाई भत्त्यामुळे आता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी 31 टक्के इतका डीए मिळणार आहे. 1 जानेवारी 2022 पासून नवा डीए कर्मचाऱ्यांना लागू होणार असून यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारातही थेट वाढ होणार आहे. राज्यातील तब्बल 17 लाख कर्मचाऱ्यांना राज्य सरकारनं घेतलेल्या निर्णयाचा थेट लाभ मिळणार आहे. दरम्यान, केंद्र सरकारनं केलेल्या महागाई भत्त्यातील वाढीनुसार आता केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना 34 टक्के इतका डीए मिळणार आहे. राज्य सरकारी कर्मचारी आणि केंद्रातील सरकारी कर्मचारी या दोघांना 2022 पासून नव्या महागाई भत्त्याप्रमाणे वेतन मिळणार आहे.
मोदी सरकारच्या पावलावर पाऊल
नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात कॅबिनेटनं केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता राज्य सरकारनं देखील महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारित येणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनर्सचा महागाई भत्ता 3 टक्क्यांनी वाढवला आहे. त्या प्रमाणं राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांचा डीए देखील वाढवण्यात आला आहे.
मार्चच्या वेतनासोबत महागाई भत्ता फरक मिळणार
राज्य शासनाच्या वित्त विभागानं जारी केलेल्या शासन निर्णयानुसार 1 जुलै 2021 पासून राज्य कर्मचाऱ्यांना 3 टक्के महागाई भत्तावाढ देण्यात येणार आहे. मार्च 2022 च्या पगारासोबत फरकाची रक्कम जमा करण्यात येणार आहे.
कर्मचारी संघटनांकडून स्वागत
बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस अविनाश दौड यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने आज दोन महागाई भत्त्यासंदर्भात शासन निर्णय जारी केले आहेत. जुलै ते सप्टेंबर या तीन महिन्यांची थकबाकी राहिली होती ती दिली आहे. या मार्चापासून महागाई भत्ता 3 टक्क्यांनी वाढवून 31 टक्के केला आहे. संघटनेच्या वतीनं मी त्यांचं स्वागत करतो. देशव्यापी संप झाला, मत्रालयासह राज्यभर जे आंदोलन झालं त्याचा हा परिणाम असल्याचं दौंड म्हणाले.