देशातील प्रमुख महामार्गांपैकी एक असलेल्या मुंबई-गोवा महामार्गासंदर्भात एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. तुम्ही जर येत्या महिन्याभरात या मार्गावरून गोव्याला (Goa) किंवा कोकणात जाण्याचा प्लॅन करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. चिपळूण जवळील परशुराम घाटातील (Parshuram Ghat) महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामासाठी उद्या म्हणजेच 22 एप्रिलपासून महिनाभरासाठी दुपारी 12 ते सायंकाळी 5 वाजेदरम्यान या मार्गावरील सर्व प्रकारची वाहतूक बंद करण्यात येणार आहे.
2 दिवसांच्या मुदतवाढीनंतर उद्या सुरु होणार काम
मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेल्या काही दिवसांपासून रखडले आहे. या रखडलेल्या कामासंदर्भात चिपळूण येथे स्थानिक प्रशासनाची बैठक पार पडत 20 एप्रिल म्हणजेच कालपासून महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरु करण्यात येणार होते. मात्र खेडमधील लोटे एमआयडीसी कंपन्यांनी नियोजनासाठी दोन दिवसांची मुदत मागितली होती. त्यानुसार परशुराम घाटातील रुंदीकरणाचे काम 20 एप्रिलऐवजी 22 एप्रिल 2022 रोजी सुरु होणार आहे. जवळपास महिनाभर हे काम सुरु राहणार असल्याने या मार्गावरील वाहतूक बंद राहणार आहे.
असा आहे पर्यायी मार्ग… –
परशुराम घाटात महिनाभर काम सुरु राहणार असल्याने वाहतुकीची अडचण लक्षात घेत पर्यायी मार्गासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात उच्च तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी बैठक घेतली होती. या बैठकीत वाहतूककोंडी टाळण्यासाठी पर्यायी व्यवस्था सुरळीत ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार लहान वाहने, राज्य परिवहन मंडळाच्या बसेस आणि लोटे एमआयडीसीतील बसेसची वाहतूक लोटे-चीरणी-आंबडस मार्गे चिपळूण अशी सुरु ठेवण्यात येणार आहे. पर्यायी मार्ग वाळवताना वाहतूककोंडी होऊ नये यासाठी चार ठिकाणी पोलिस चौकी उभारण्यासंदर्भात देखील निर्णय घेण्यात आला. त्यानुसार 22 एप्रिल 2022 पासून कंत्राटदाराकडून कामास सुरुवात होणार आहे.