आयपीएलच्या 18 व्या मोसमातील अंतिम सामन्याला आता सुरुवात होण्यासाठी मोजून काही तासांचा कालावधी बाकी आहे. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यातील महामुकाबल्याला 3 जून रोजी संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. श्रेयस अय्यर पंजाबचं तर रजत पाटीदार आरसीबीचं नेतृत्व करणार आहे. या सामन्याआधी श्रेयसने रजत पाटीदार याला डिवचत गेल्या 6 महिन्यांआधीची एक आठवण करुन देत जखमेवर मीठ चोलण्याचा प्रयत्न केला आहे. रजतने आयपीएल फायनल महामुकाबल्याआधी रजतला असं काय म्हटलं? जाणून घेऊयात.
श्रेयस अय्यर याच्या नेतृत्वात मुंबई टीमने 15 डिसेंबर 2024 रोजी देशांतर्गत क्रिकेटमधील प्रतिष्ठेच्या असलेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेतील अंतिम सामन्यात मध्य प्रदेशवर मात केली होती. मध्य प्रदेशला रजत पाटीदार याच्या नेतृत्वात अंतिम फेरीत पराभूत व्हावं लागलं होतं. श्रेयसने रजतला याच पराभवाची आठवण करुन देत जुन्या जखमेवरची खपली काढण्याचा प्रयत्न केला. श्रेयसने रजतला आताही तशीच (सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी फायनल) भावना असल्याचं म्हटलं.
श्रेयस अय्यर काय म्हणाला?
“मला आयपीएल फायनलआधी सय्यद मुश्ताक अली टी 20 ट्रॉफी स्पर्धेची आठवण येत आहे. जेव्हा मी रजतला भेटलो तेव्हा त्याला सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी फायनलची पुनरावृत्ती होणार असल्याचं म्हटलं”, असं श्रेयसने आयपीएल 2025 फायनलआधी झालेल्या पत्रकार परिषदेत म्हटलं. टीमसाठी मॅच जिंकणं चांगली भावना आहे”, असं श्रेयसने नमूद केलं.
आरसीबी आणि पंजाब किंग्स दोन्ही संघांना आतापर्यंत एकदाही आयपीएल ट्रॉफी जिंकता आलेली नाही. त्यामुळे आरसीबीचा ट्रॉफी जिंकून ही प्रतिक्षा संपवण्याचा प्रयत्न असणार आहे. तर दुसऱ्या बाजूला श्रेयस कर्णधार म्हणून सलग दुसऱ्या संघाला आयपीएल ट्रॉफी जिंकून देण्याच्या प्रयत्नात आहे. श्रेयसने17 व्या मोसमात (IPL 2024) कोलकाता नाईट रायडर्सला ट्रॉफी जिंकून दिली होती.
आरसीबी की पंजाब? कोण होणार IPL 2025 चॅम्पियन?
श्रेयस अय्यरची 18 व्या हंगामातील कामगिरी
श्रेयस अय्यरने त्याच्या नेतृत्वात कोलकाता नाईट रायडर्सला आयपीएल 2024 ची ट्रॉफी मिळवून दिली. त्यानंतर श्रेयसला पंजाबचं कर्णधारपद देण्यात आलं. श्रेयसने या हंगामात नेतृत्वासह बॅटिंगनेही अप्रतिम कामगिरी केली. श्रेयसने आतापर्यंत 18व्या मोसमात एकूण 16 सामन्यांमध्ये 603 धावा केल्या आहेत. श्रेयसने या दरम्यान 6 अर्धशतकंही झळकावली आहेत.