पेठ-सांगली महामार्गावर बावची फाटा (ता. वाळवा) येथे मालवाहू ट्रक, मोटार व दुचाकीच्या झालेल्या अपघातातील मोटारीतील पाच जखमींपैकी हमिद जाफर जमादार यांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला.
अपघाताबाबतची माहिती ट्रकचालक भीमराव महादेव आंधळे (वय ४२, गुळज, ता. गेवराई, जि. बीड) यांनी दिली आहे. दुचाकीस्वार अशोक रामचंद्र पाटील (पोखर्णी, ता. वाळवा) याच्यावर गुन्हा नोंद झाला आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की काल (ता. १४) रात्री ७.३० च्या सुमारास पेठ-सांगली महामार्गावर बावचीच्या हद्दीत जुना वाळवा रस्ता, महालक्ष्मी पेट्रोलपंपाजवळ भीमराव आंधळे हे मालवाहू ट्रक (एमएच ४६, सी एल ९९७९) घेऊन सांगलीहून इस्लामपूरच्या दिशेने निघाले.
असताना बावची फाटा परिसरात आले असता जुना वाळवा रस्ता ते महालक्ष्मी पेट्रोलपंपाकडे अशोक पाटील दुचाकीवरून (एमएच १०, ए ए ०८५७) महामार्ग पार करत असताना अचानक इस्लामपूरच्या बाजूने आलेल्या मोटारीसमोर (एमएच १३, ए झेड १७२९) आले. अचानक समोर आलेल्या अशोक पाटील याला वाचवित असताना चालकाने त्याची मोटार रस्त्याच्या उजव्या बाजूला घेतली. या मोटारीची इस्लामपूरच्या दिशेने निघालेल्या फिर्यादी भीमराव आंधळे यांच्या ट्रकच्या उजव्या बाजूच्या बंपरला जोरात धडक बसली.
या भीषण धडकेत मोटारीतील सादिक जाफर जमादार, हमिद जाफर जमादार, हारुण गुलाब मुलाणी, झुलेखा हारूण मुलाणी, रेहान हारूण मुलाणी (सर्व कासेगाव, ता. पंढरपूर, जि. सोलापूर) हे जखमी झाले होते. त्यांच्यावर सांगली येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारांदरम्यान रात्री एक वाजता हमिद यांचा मृत्यू झाला. ट्रकचे दोन लाखांचे, तर मोटारीचे दोन लाख, साठ हजारांचे नुकसान झाले.